विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार घालू
वार्ताहर /शिवोली
गोव्यात जेव्हा कोणी नेता निवडणुकीच्या सभा घेण्यासाठी भेट देतो तेव्हा तो नेता येणाऱया मार्गावरील सर्व रस्ते चकाचक होतात. सौंदर्यकीकरण केले जाते. हे अवघ्या काही दिवसांत करणे सरकारला शक्य आहे तर आम्हाला पाण्याचा बुस्टर बसवून आमची पाण्याची सोय करणे सरकारला शक्य नाही. आदी बुस्टर बसवून आमची पाण्याची सोय करा अशी मागणी बंदिरवाडा कायसुव व बादें आसगाव येथील महिलांनी एकत्रित येऊन केली. पाण्याची समस्या सरकारने सोडवावी अशी मागणी करीत प्रसिद्धी माध्यमातून सरकारला इशारा दिला.
बंदिरवाडा, कायसुव व बादें आसगाव येथील लोकांना गेल्या साडे चार वर्षांपासून पाण्याचा सुरळीत पुरवठा होत नाही. लोकांचे हाल होत आहे. या भागातील अंदाजे तीन हजार लोक पाण्यापासून वंचीत आहे. सरकारी अधिकारी फक्त थातुरमातूर उत्तरे देत दिवस काढत आहेत. आता बस! झाले आम्ही कळश्या व घाघऱया घेऊन मोर्चा काढणार नाही, विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. वाळपई येथील लोकांनी रस्त्या झाला नाही तर निवडणुका नाही असे सरकारला इशारा देऊन जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांवर बहिष्कार घातला होता. तशी भूमिका यंदा आम्ही येथील नागरिक घेणार आहे. आम्ही सर्व रस्ते अडवून निवणुका होऊ देणार नाही असा इशारा येथील नागरिकांच्यावतीने समाजसेवक व रहिवासी पार्वती नागरवेकर यांनी दिला.
आमदार बिनकामाचा
मते मागण्यासाठी लोकप्रतिनिधी दारोदारी फिरतात. आमच्या समस्या सोडवू अशी आश्वासने देतात. निवडून आले की त्यांनी दिलेली सर्व आश्वासने विसरुन जातात. त्यांना आमचे सोयर-सुतक नाही. कोविडच्या महामारीत आम्हाला ढूंकनही पाहिले नाही तो आमच्या समस्या काय सोडणार असा रोष काढीत आमदार बिनकामाचा असा आरोप येथील एका महिलाने केला.
काही तास पाणी सोडा
गेल्या काही माहिन्यांपूर्वी थोडे तास नळाला पाणी येत होते. नुकतेच येथे भूमीगत वीज वाहिन्या घालण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम केले होते. तेव्हापासून आम्हाला या भागात सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. पाण्याची पाईपलाईन 45 वर्षांपूर्वीची आहे व ती बदलणे गरजेची आहे. सभांचा काहीच फायदा होत नाही. आम्हाला ताबडतोब पाणी उपलब्ध झाले नाही तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा येथील महिलांनी दिला.
पंचसदस्य श्रीसागर नाईक
या जमावात आसगाव पंचायतीचे पंचसदस्य श्रीसागर नाईक यांनी सांगितले की, आम्ही पंचायतीमार्फत सार्वजनिक बांधकाम खात्याला पाईपलाईन बदलण्यासंदर्भात मार्च महिन्यात निवेदन सादर केले होते. पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. घरगुती वापराच्या लाईनवर या भागातील हॉटेल्सनां जोडणी दिली आहे त्यामुळे त्यांना दररोज पाणी मिळते व आम्हाला एक दिवस सोडून पाणी येते हे योग्य नाही. अधिकाऱयांनी आमच्या पाण्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे असे श्रीसागर नाईक यांनी सांगितले.