चार दिवसात सुरळीत पुरवठा न झाल्यास मोर्चा, ग्रामस्थांचा इशारा
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरीतील पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील देऊळवाडा, पंचायतवाडा, शांतीनगर, घाटवाडा भागामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गं†िभर निर्माण झालेली आहे. गेल्या दोन वर्षापासून ही समस्या जाणवत असून सध्या या भागातील ग्रामस्थ टँकरच्या पाण्यावर गरज भागवित आहेत. सध्यातरी अनियमित येणाऱया टँकरच्या पाण्यामुळे तीव्र संताप पसरला आहे. चार दिवसांत सुरळीत पाणी पुरवठा न झाल्यास वाळपई पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रकरणी नवनिर्वाचित आमदार दिव्या राणे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, पिसुर्ले पंचायत क्षेत्रात गेल्या दोन वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकून ही समस्या सोडविण्याचे आश्वासन पाणी पुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱयांनी अनेक वेळा दिले होते. आश्वासनांची केवळ खैरात होत असून मात्र प्रत्यक्षपणे अंमलबजावणी होत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पिसुर्लेत गेल्या आठ दिवसापासून पाणी समस्या गंभीर झाली आहे. चार दिवसांत समस्या सोडविण्यासाठी गांभीर्याने लक्ष न दिल्यास पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा नेण्यापेक्षा दुसरा पर्याय नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पंचायत सदस्य देवानंद परब सांगितले की, या भागात खास पाणि प्रकल्प उभारून या भागांमध्ये 24 तास पाणी उपलब्ध करणार असल्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी अजून झाली नाही. गेल्या दोन वर्षापासून लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. गावात अनेकवेळा टँकरचे पाणी मिळत नसल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत.
वाळपई ााणीपुरवठा कार्यालयाशी फोनवरून तक्रारी केल्या तसेच अनेक वेळा पंचायतीमार्फत तक्रार सादर केली. मात्र या प्रकरणी गांभिर्याने लक्ष दिले नाही. यामुळे ग्रामस्थ त्रस्त बनले आहेत.
पिसुर्ले गावात टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा हा शुध्द नसतो. मात्र या पाण्यावर सध्यातरी या भागातील ग्रामस्थांना आपली गरज भागवावी लागत आहे. अनेक वेळा टँकर वेळेवर पोहोचत नसल्यामुळे लोकांना खासगी टँकरवर अवलंबून रहावे लागते ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला जाग आणण्यासाठी मोर्चा नेल्याशिवाय पर्याय नसल्याचे देवानंद परब यांनी सांगितले.