क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज बुधवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर एफसी गोवा संघाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कोलकाताचा एटीके मोहन बागानचा संघ सज्ज झाला आहे.
एटीके मोहन बागानला गेल्या दोन सामन्यांत विजय मिळविता आला नाही. त्यामुळे या संघाला गुणतक्त्यातील आघाडीचे स्थान गमवावे लागले. आता याच स्थानावर परतण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. एटीके मोहन बागानचे पाच सामन्यांतून 10 गुण झाले असून ते तिसऱया तर एफसी गोवाचे 8 गुण झाले असून ते पाचव्या स्थानावर आहेत.
या लढतीत आयएसएलमधील दोन बलाढय़ संघ आमनेसामने येतील. त्याचवेळी डावपेचांत कुशल असलेल्या पण वेगवेगळी शैली असलेल्या प्रशिक्षकांमध्येही हा मुकाबला रंगलेला असेल. एटीकेचे प्रशिक्षक आंतोनियो हबास चेंडूवर ताबा ठेवण्याच्या धोरणासाठी सर्व पर्याय खर्च करीत नाहीत. त्याऐवजी त्यांचा संघ प्रतिआक्रमणासाठी ओळखला जातो आणि बचावात्मक पातळीवर ते संघटित राहतात. चेंडूवरील ताब्याची कोलकाताच्या या मातब्बर संघाची सरासरी 46 टक्के राहिली आहे.
दुसरीकडे जुआन फॅर्रांडो यांच्या एफसी गोवाची शैली याच्या विरूद्ध आहे. प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजविण्यास त्यांची पसंती असते आणि चेंडूवरील ताब्यात त्यांचा वाटा सर्वाधिक असतो. त्यांची ही सरासरी 59 टक्के आहे, जी सहभागी संघांमध्ये सर्वाधिक आहे.
एटीके मोहन बागानसमोर दोन खेळाडूंच्या दुखापतींची समस्या आहे. झेवियर हर्नांडिझ आणि टिरी यांच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे संघाचे संतुलन विस्कळीत झाले आहे. मागील सामन्यात हैदराबाद एफसीविरुद्ध बरोबरी साधावी लागल्यानंतर हबास यांनी याबाबतीत समस्या असल्याचे बोलून दाखवले होते. या मोसमात मोठी वाटचाल करायची आहे. आम्हाला पराभूत नक्कीच व्हायचे नव्हते, पण दुखापतींच्या बऱयाच समस्या आहेत. आम्हाला खेळाडू तंदुरुस्त करावे लागतील आणि त्यांना खेळवावे लागेल, असे हबास म्हणाले.
एफसी गोवासाठी त्यांचे गोल मशीन आणि यंदा सहा गोल केलेला इगोर अँग्युलो आपल्या गोलांची संख्या वाढविण्यास आतुर असेल. एटीके मोहन बागानसाठी प्रतिआक्रमण रचण्यात रॉय कृष्णा याला पुढाकार घ्यावा लागेल. फिजीच्या रॉय कृष्णाने संघाचे सहा पैकी चार गोल केल आहेत आणि त्याचे हे सर्व गोल दुसऱया सत्रात झाले आहेत. एफसी गोवाविरुद्धचे पाच पैकी तीन गोल मध्यंतरानंतर झाले आहेत. त्यामुळे फॅरांडो यांच्या संघाला संपूर्ण सामन्यात दक्ष राहावे लागेल.
संघासाठी अशी एक योजना असणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण आम्ही एका चांगल्या संघाविरुद्ध खेळणार आहोत, केवळ रॉय कृष्णाच आमचा प्रतिस्पर्धी नाही, असे फॅरांडो म्हणाले. आमच्यासाठी संघटित राहणे महत्वाचे असेल. त्याचवेळी वेळ, चेंडूचे क्षेत्र आणि चाल रचण्यासाठी मोकळीक मिळवण्यालाही महत्त्व असेल. 90 मिनिटे अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते. आमचा संघ विलक्षण क्षमतेचा आहे, कारण ते मैदानावर 90 मीनटे कसून प्रयत्न करतात, असे शेवटी फॅरांडो म्हणाले.