वारणानगर / प्रतिनिधी
कोरोना व महापुरामुळे शेतकऱ्यांसह लहान -मोठया घटकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून बँका व पतसंस्थानी कर्ज परतफेडीसाठी वसुलीसाठी कर्जदाराकडे तगादा लावला आहे. अशा बँका संस्थांनी अन्यायकारक वसुली थांबवावी असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघूनाथदादा पाटील यांनी मेळाव्यात बोलताना दिला.
वारणानगर ता. पन्हाळा येथील पंचमुखी हनुमान कुस्ती आखाडा येथे शेतकरी संघटनेच्या वतीने आज रविवार दि. १४ रोजी दुपारी कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या कर्जदारांचा भव्य मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते मेळाव्याचे संयोजन येथील माजी सैनिक आनंदराव सरनाईक (फौजी बापू) यांनी केले.
रघूनाथदादा म्हणाले,वारणा व कृष्णा नदीच्या महापुरामुळे नदीकाठचा शेतकरी उध्दवस्त झाला आहे त्यामूळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी व इतर घटकांतील नागरीकांना पुन्हा उभे करण्यासाठी संघटना खंबीरपणे पाठीशी राहील. बँका, पतसंस्था, सावकारी व फायनान्स कंपन्या,संस्थाकडून सुरू केलेले कारस्थान, उद्योग त्वरीत थांबवावेत असे सांगून अडचणीतील कर्जदाराला न्याय दिल्याशिवाय संघटना थांबणार नाही असा विश्वास दिला. आनंदराव सरनाईक म्हणाले, सध्या बँका व पतसंस्थांनी कर्ज वसूलाची तगादा लावला असून शेतकरी, लहान-मोठे घटक अक्षरशः मेटाकुटीला आला आहे अशा घटकांच्या पाठीशी संघटनेने राहवे तसेच कर्जदारांची योग्य बाजू न्यायालयात मांडण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर वकीलांचे पॅनेल उभे करणार असल्याचे जाहीर केले.
संघटनेचे जिल्हा संघटक बाळ नाईक यांनी सध्या कर्जदार भयभीत झाला असून त्यांना अडचणीतूंन बाहेर काढण्यासाठी संघटनेचे नेते रघूनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला ताकद देण्याचे आवाहन केले. यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अॅड माणिक शिंदे,सांगली जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील कार्यकारीणी सदस्य महादेव कोरे, महिला आघाडी वंदनाताई माळी आदींची भाषणे झाली संघटनेचे संपर्क प्रमुख उत्तम पाटील यांनी स्वागत केले तर अॅड. माणिक शिंदे यांनी प्रास्ताविक केले.