15 ठार, 400 हून अधिक बेपत्ता, चौकशी होणार
ढाका / वृत्तसंस्था
बांगला देशात रोहिंग्या मुस्लीमांच्या वस्तीला लागलेल्या आगीत किमान 15 जण ठार झाले असून किमान 400 जण बेपत्ता आहेत. या आगीत किमान सहा हजार झोपडय़ा जळाल्या असून 5 हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत, अशी माहिती ढाका येथील प्रशासकीय अधिकाऱयांनी पत्रकारांना दिली. ही आगीची दुर्घटना सोमवारी घडली असून चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
गेल्या एका आठवडय़ात अशा किमान तीन मोठय़ा आगी लागल्या आहेत. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार आहे काय याचीही चौकशी होणार आहे. आग झपाटय़ाने पसरल्याने लोकांची पळापळ झाली. आग विझविणारे बंब येण्यास उशीर झाल्याने आगीवर नियंत्रण लवकर मिळविता आले नाही. त्यामुळे हानी अधिक प्रमाणात झाली. आतापर्यंत 15 मृतदेह हाती लागले आहेत. अनेकांना पळून न जाता आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला असेही सांगण्यात आले.
गोळीबारात 7 ठार
ही घटना घडण्यापूर्वी अन्य एका रोहिंग्या वस्तीच्या बाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्याने सात रोहिंग्या ठार झाले. या गोळीबाराची चौकशीही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोहिंग्यांचा उपद्रव होत असल्याची तक्रार ढाक्यातील स्थानिकांनी केली होती. याच वादातून गोळीबाराची घटना घडली असावी असा अंदाज आहे. रोहिंग्या मुस्लीम मूळचे बांगला देशातीलच आहेत. मात्र, साधारणतः 100 वर्षांपूर्वी त्यांनी म्यानमारमध्ये घुसखोरी केल्याचा आरोप केला जातो. 2011 मध्ये म्यानमार लष्कराने त्यांच्या विरोधात धडक कारवाई केल्याने ते बांगला देशात पळून आले आहेत. म्यानमारमध्ये स्थानिकांवर हल्ले केल्याचा आरोप केला जात होता. आता बांगला देशातही त्यांच्या विरोधात तक्रारी वाढत आहेत. स्थानिकांशी होत असलेल्या वादातूनच आगीचे प्रकार होत आहेत, असाही प्रशासनाचा अंदाज असल्याने त्या दिशेने चौकशी केली जात आहे.