बेंगळूरात कार अपघातात आमदार पुत्रासह 7 ठार
प्रतिनिधी/ बेंगळूर
आलिशान ऑडी क्यू या भरधाव कारने फुटपाथवरील खांबाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तामिनाडूमधील होसूरचे आमदार वाय. प्रकाश यांचा मुलगा, त्यांची भावी सून यांच्यासह सात जण ठार झाले. बेंगळूरच्या कोरमंगल परिसरात सोमवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास हा अपघात घडला. मागील वर्षी आमदार प्रकाश यांच्या पत्नीचे निधन झाले होते. आता एकुलता एक मुलगा अपघातात ठार झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातात डीएमके पक्षाचे आमदार वाय. प्रकाश यांचे पुत्र करुणासागर आणि त्यांची भावी सून बिंदू (वय 28 रा. बेंगळूर), इशिता बिश्वास (वय 21 रा. महाराष्ट्र), डॉ. धनुषा (वय 29 रा. केरळ), अक्षय गोयल (वय 25 रा. कुंडकोलम, केरळ), उत्सव (वय 25 रा. हरियाणा) आणि रोहित (वय 20 रा. हुबळी) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मृत इशिता बिश्वास, धनुश, रोहित आणि अक्षय हे सर्वजण बेंगळूरच्या कोरमंगल येथील एका पीजीमध्ये वास्तव्यास होते. धनुश हा दंतवैद्य तर अक्षय हा सेल्स असोसिएट होता. उत्सव लेखापरिक्षक तर रोहित हा बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर होता. इशिता ही एमएससी कंपनीत काम करत होती. आमदार पुत्र करुणासागर हा मित्रांसमवेत पीजीमध्ये राहत होता.
घटने विषयी अधिक माहिती अशी की, करुणासागर हा मित्रांसमवेत सोमवारी रात्री पार्टी करून परतत असताना त्याच्या कारला अपघात झाल्याचे समजते. अपघात इतका भीषण होता की, कारचे दोन्ही टायर फुटून बॉनेटचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. यात सहाजण जागीच ठार झाले. तर आणखी एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी बेंगळूर रहदारी विभागाचे पोलीस आयुक्त रविकांतेगौडा यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघाताला भरधाव वेगच कारणीभूत असून कारमधील कोणीही सीटबेल्ट घातले नव्हते, असे दिसून आले. त्यामुळेच कारमधील एअरबॅग ओपन झाली नाही. घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे, अशी माहिती रविकांतेगौडा यांनी दिली.
कोरमंगल येथे कारला अपघात होण्याआधी पोलिसांनी रात्री 11.50 वा. आमदार पुत्राची ऑडी कार अडवून तपासणी केली होती. त्यावेळी पोलिसांनी कारमधील युवकांना ताकीद दिली होती. तपासणीवेळी करुणासागर याने आपण आमदाराचा मुलगा असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यावेळी पोलिसांनी शहरात नाईट कर्फ्यू असल्याचे सांगितले. त्यावर करुणासागरने माफी मागत गाडी पुढे नेली होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे.