तालिबान करू शकतो मदत – गुप्तचर यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा
वृत्तसंस्था / श्रीनगर
पाकिस्तानात असलेले दहशतवादी काश्मीर खोऱयात मोठा हल्ला करण्याचा कट रचत आहेत. यासंबंधी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एक नव्हे तर 10 वेळा इशारा दिला आहे. हे दहशतवादी तालिबानची मदत घेऊ शकतात असेही म्हटले जात आहे. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा केला होता. काश्मीरप्रकरणी तालिबान साथ देणार असल्याचे पाकिस्तान तेव्हापासून म्हणत आहे.
अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यापासून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानात असलेले दहशतवादी सीमा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करण्याची योजना आखत आहेत. मागील 15 दिवसांमध्ये गुप्तचर यंत्रणांनी 10 वेळा इशारा जारी केला आहे. सीमेवर मोठा हल्ला घडवून पाहणाऱया संशयितांबद्दल हा इशारा देण्यात आला आहे.
या इशाऱयांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांमध्ये बदल झाल्याचे गुप्तचर यंत्रणांना आढळून आले आहे. सुरक्षा यंत्रणांना ग्रेनेड हल्ले, हाय व्हॅल्यू टार्गे म्हणजेच महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले, सुरक्षा दलांरवर हल्ले आणि सर्वजनिक ठिकाणी आयईडी स्फोटावरून सतर्क करण्यात आले आहे.
5 दहशतवाद्यांचा एक गट पाकव्याप्त काश्मीरच्या जांडरोटच्या मार्गे पुंछच्या मेंढर भागात घुसखोरी करू शकतो असे एका इशाऱयात म्हटले आहे. हे सर्व दहशतवादी हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित आहेत.
सोशल मीडियावरही दहशतवाद्यांची सक्रीयता वाढली आहे. सोशल मीडियावर प्रसारित चित्रफितींद्वारे खोऱयातील तरुणांची दिशाभूल केली जात आहे. अशाप्रकारच्या चित्रफितींवर करडी नजर असल्याचे गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे. तालिबान आणि जैश-ए-मोहम्मदच्या म्होरक्यांची कंधारमध्ये झालेल्या बैठकीबद्दल गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली आहे. ही भेट ऑगस्टच्या तिसऱया आठवडय़ात झाली आहे.