पश्चिम बंगालमध्ये धोका असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील भाजपच्या सर्व 77 आमदारांना केंद्रीय सुरक्षा मिळणार आहे. बंगालमधील निवडणुकीचा निकाल लागल्यावर राज्यातील अनेक जिल्हय़ांमधील स्वतःच्या कार्यकर्त्यांवर हल्ले आणि पलायनासह पक्ष कार्यालयात तोडफोड करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यातील हिंसाचाराची दखल केंद्र सरकार तसेच न्यायालयानेही घेतली आहे.
तृणमूल काँग्रेसचे गुंड भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांवर हल्ले करत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांनीही एक चित्रफित प्रसारित करत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला झाल्याचा आरोप केला होता. बंगालमधील हिंसाचारात आतापर्यंत 20 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. अनेकांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात हिंसाचार होत असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.