भाजल्यामुळे मृत्यू पावणाऱयांची संख्या भारतात मोठी आहे. थोडय़ा प्रमाणात भाजलेले असेल तरी जंतुसंसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. या संसर्गामुळेही जीव जाण्याची शक्यता असते. मात्र आता यावर उपाय शोधल्याचे प्रतिपादन संशोधक अशुतोष पांडे यांनी केले आहे. ते स्वतः याच क्षेत्रात पीएचडी करीत आहेत.
उत्तर प्रदेशच्या वस्त्रोद्योग विभागात ते काम करतात. त्यांनी विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या साहाय्याने एक सेल्युलोज पट्टी निर्माण करण्यात यश मिळविले असून ही पट्टी भाजलेल्या जखमांवर लावल्यास ती त्वचेचेच काम करणार आहे. त्यामुळे भाजलेल्या जखमा नेहमीच्या दुप्पट वेगाने भरुन तर येणार आहेतच, पण त्यांना जंतुसंसर्गही होणार नाही. अशा प्रकारे भाजण्यामुळे झालेल्या जखमांना ‘दुहेरी संरक्षण’ या पट्टीमुळे मिळणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या पट्टीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करण्यात येणार आहे, असे सांगितले गेले आहे. या पट्टीमुळे 60 टक्क्यांहून अधिक प्रमाणात भाजलेले रुग्णही बरे होऊ शकतील, असे पांडे यांचे म्हणणे आहे. भाजलेल्या जागी नव्या नैसर्गिक त्वचेची निर्मिती होईपर्यंत ही सेल्युलोजची कृत्रिम त्वचा संरक्षण करणार आहे. तसेच नवी त्वचा निर्माण होण्याचा वेगही वाढणार असल्याने हा रामबाण उपाय ठरु शकेल