रिक्षाचालक हरी गावडे यांनी जपली परंपरा
उदय सावंत/होंडा
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी!
लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी !
अशा अभंरचना करणाऱया संत सावतामाळी यांची परंपरा जपणारे अनेक व्यक्ती भारतात आहेत. गोव्यातही अशी अनेक व्यक्तिमत्त्व आहेत. आपला प्रपंच सांभाळून आपला पोटापाण्याचा व्यवसाय करुन आपली वडिलोपार्जित भाजी उत्पादनाची परंपरा जपतात. पोस्तवाडा-होंडा येथे राहणारे हरी गावडे हे त्यापैकी एक. ते विठ्ठलभक्त आहेत. येथील नवनाथ देवस्थानांमध्ये होणाऱया प्रत्येक गुरुवारच्या भजन कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतात. टेम्पो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरवषी आपल्या जागेमध्ये ते भाजी उत्पादन करतात. मोठय़ा प्रमाणावर नाही पण स्वतःच्या घरासाठी लागणारी भाजी ठेऊन काही भाजी विकून घरखर्चासाठी मदत करतात. त्यांच्या पत्नी हर्षा तथा शैला गावडे या त्यांना या कामात मदत करतात .
हरी गावडे व हर्षा गावडे हे दांपत्य आवळामळ होंडा येथील आपल्या लहानशा जागेमध्ये भाजीचा मळा फुलवतात. त्यामध्ये हिरवी मिरची, लाल भाजी, मुळा, दोडकी, वाल, चिटकी, वांगी, मका आदी विविध भाज्यांचे उत्पादन घेतात. एकावषी ते भाजी उत्पादन जेवढे घेतात तेवढेच ते पुढील वषी घेतात. माफक अपेक्षेने भाजी उत्पादन करताना त्यांनी उत्पादन मर्यादा वाढवलेली नाही. मोठय़ा प्रमाणात भाजी उत्पादन का करत नाही ? असे हरी गावडे यांना विचारले असता सांगितले की ज्या जागी आपण भाजी लावतो ती जागा घरापासून दूर आहे. जंगली डुकरासोबतच मोरांचा फार त्रास होतो. मोर भाजीची नासाडी करतात. कळपाने येणारे डुक्कर मूळे उन्मळून काढून खातात . इतर भाजीची नासाडी करतात. मोर येऊन भाजी, मिरची फस्त करतात. मात्र परंपरा जपण्यासाठी आणि मातीशी असलेले आपले नाते तुटू नये यासाठी आम्ही दरवषी भाजीचे रोप लावतो, असे हरी गावडे यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे जेवढय़ा जागेत भाजी उत्पादन करतो तेवढय़ा जागेतच दरवषी भाजी उत्पादन घेतो. इतर जागेमध्ये काजूची जवळजवळ 100 पेक्षा जास्त कलमे लावली असून केळीची काही रोप लावल्याचे गावडे यांनी सांगितले. आपण पहाटे पाच वाजता आपल्या या पोरसूत तथा भाजी उत्पादनाच्या जागेमध्ये येतो. आणि काम सुरू करतो. पत्नीही यासाठी सहकार्य करते.
दोन्ही मुलांचाही सहभाग
भाजीच्या मळय़ातली लहान-सहान कामे करतो. भाजीला जवळच असलेल्या विहिरीतून पंप लावून पाणी देतो. इतर झाडानाही पाणी देतो. त्यानंतर घरी जाऊन आंघोळ व न्याहरी करून टेम्पो रिक्षाने भाडे मारण्यासाठी जातो. पत्नी संध्याकाळी मळय़ात पुन्हा जाते. अशाप्रकारे आमचा दिनक्रम चालतो. या कामात शाळेला सुट्टी असताना आपले दोन्ही मुलगे हर्ष व हेमंत मदत करतात. मुलांना मातीत हात घालायची सवय व्हावी, कष्टाची सवय व्हावी . यासाठी मुलांना भाजी उत्पादन कामात सहभागी करून घेतो, असे गावडे यांनी सांगितले.
मोरांकडून पिकाची नासाडी
गेल्या वषी मोरांनी मोठय़ा प्रमाणात मिरची आणि इतर पिकांची नासाडी केल्यामुळे दुहेरी पीक घ्यावे लागते. त्यामुळे मिरची मोठय़ा प्रमाणात मिळाली नाही. मोरांना अडवण्यासाठी जुनी कापडे मळय़ाभोवताली लावून मोरांना अटकाव करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मात्र मोर हवेतून उडून येउन भाजी फस्त करतात, अशी माहिती गावडे यांनी दिली.
ज्या जागी भाजी उत्पादन केले जाते त्या जागी पावसाळय़ात जवळच्या नाल्याच्या पुराचे पाणी भरते आणि विविध प्रकारचा कचरा पोरसूच्या जागेत येऊन पडतो तो दरवषी साफ करावा लागतो, अशी माहितीही हरी गावडे यांनी दिली.
गोव्यात अशी अनेक कुटुंबे आहेत की ती स्वतःच्या जागेमध्ये थोडय़ाशा प्रमाणात विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन करतात. तसेच मिरची पीकही घेतात. भाजीचा लाभ काही महिने तर मिरचीचा उपयोग त्यांच्या संसारासाठी तथा कुटुंबासाठी वर्षभरासाठी होतो. तसेच पाहुण्यांना आणि मित्रांनाही भाजी भेट म्हणून अशी कुटुंबे देतात. काही कुटुंब उर्वरित भाजी बाजारांमध्ये देतात. अशा प्रकारे एक परंपरा म्हणून भाजी उत्पादन राज्यात केले जाते.
गेल्या वर्षी 100 किलो काजूचे उत्पादन
गतवषी आपण 100 किलो काजूचे उत्पादन घेतले . आपण लावलेली काजू कलमे लहान आहेत . त्यामुळे थोडय़ा काजूची लागवड होत आहे. येत्या काळात काजू उत्पादन वाढण्याची शक्मयता आहे. काजूचे उत्पादन करताना काजूच्या बोंडापासून रस काढून तो दारूच्या भट्टीला आपण पुरवला .
— हरी गावडे.
वर्षाला चार ते पाच हजारांची भाजी विकतो
दरवषी आम्ही घराला जेवढी भाजी हवी तेवढी वापरतो. जवळच्या लोकांनाही काही भाजी देतो आणि उर्वरित भाजी विकतो. त्यातून पाच ते सहा हजार रुपये वर्षाला आम्हाला मिळतात. भाजी लावतांना मनाला जे समाधान मिळते ते अपूर्व असेच असते. मिरचीची विक्रीही वर्षाला तीन ते चार किलो करतो.
— हर्षा गावडे