लडाखमध्ये तणाव कमी करण्याचा निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दोन महिन्यांच्या कालांतरानंतर भारत आणि चीन यांच्यात लडाख संघर्षासंबंधी चर्चेची 13 वी फेरी पूर्ण करण्यात आली आहे. संघर्षबिंदूंवरुन सेना मागे घेऊन तणाव कमी करण्यासंबंधी या चर्चेत एकमत झाले. हॉट स्प्रिंग भागातून सेना माघारीची तयारी दोन्ही बाजूंकडून दाखविण्यात आली, असे स्पष्ट करण्यात आले.
रविवारी सकाळी साडेदहा वाजता चर्चेला प्रारंभ करण्यात आला. त्यापूर्वी भारताचे विदेश व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे विदेश मंत्री वांग यी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. लडाख प्रकरणी लवकरात लवकर तणाव निवळण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाले पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दोन महिन्यांनंतर
31 जुलै 2021 ला चर्चेची 12 वी फेरी झाली होती. त्यानंतर जवळपास सव्वादोन महिन्यांनी दोन्ही बाजूंच्या सेनाधिकाऱयांची चर्चा झाली. तसेच 16 सप्टेंबरला दोन्ही देशांच्या विदेश व्यवहार मंत्र्यांची एसीओ शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट झाली होती. त्या भेटीतही लडाखच्या मुद्यावर बोलणी झाली होती.
नरवणे यांचा इशारा
लडाख सीमेवर चीन जितके सैन्य आणेल तितकेच भारतही आणल्याशिवाय राहणार नाही. चीनच्या दबावाखाली आम्ही येऊ अशी कोणाची समजूत असेल तर ती भ्रामक आहे. आमची सेनाही आमच्या बाजूकडे सज्ज असून कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज आहे, असा इशारा भारताचे भूसेना प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी गुरुवारीच चीनला दिला होता.
उत्तराखंड, अरुणालचलतही… काही दिवसांपूर्वी चीनने उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातही घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि सजग भारतीय सैनिकांनी तो उधळला होता. अरुणाचल प्रदेशाच्या तावांग प्रदेशात काही चीनी सैनिकांना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. चीननेही माघार घेतली होती.