म्हादईच्या विषयावरुन प्रकरण हातघाईवर
प्रतिनिधी/ पणजी
राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांमधील वाद पुन्हा उफाळून आल्यानंतर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचा पारा बराच वर चढला. त्यातच मंत्री माविन गुदिन्हो यांचाही आवाज चढल्यानंतर मंत्री मायकल लोबो यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हातघाईवर पोहोचलेले प्रकरण आटोक्यात आले. मुख्यमंत्र्यांसमोर झालेल्या पाणउताऱयानंतर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सायंकाळी दिल्ली गाठली.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोर मंत्री गोविंद गावडे आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या दरम्यान गेल्यावर्षी उफाळून आलेल्या वादामुळे त्यावेळची मंत्रीमंडळ बैठक गाजली होती.
मंत्रिमंडळ बैठकीतच पुन्हा गंभीर वाद
त्यानंतर एका वर्षानंतर मंगळवारी विधानसभा अधिवेशनाच्या अर्धातास अगोदर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत म्हादईचा विषय चर्चेस आला असता प्रतापसिंह राणे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्नाटकाला म्हादईचे पाणी वापरण्यास हरकत नाही, अशा आशयाचे पत्र त्यावेळी दिले होते. आपण त्यास विरोध केला होता, असे माविन गुदिन्हो यांनी सांगितल्यामुळे वाद निर्माण झाला.
प्रतापसिंह राणे यांच्या पत्रामुळेच म्हादईचा प्रश्न : गुदिन्हो
प्रतापसिंह राणे यांनी त्यावेळी जे पत्र दिले त्यामुळेच आज गोवा म्हादईसंदर्भात या समस्येला तोंड देत असल्याची टिपणी गुदिन्हो यांनी करताच आरोग्यमंत्री विश्वजित राणे संतप्त झाले. रागाच्या भरात त्यांनी माविनवर प्रचंड आरोप केले व अपशब्दही वापरले. युवक काँग्रेस अध्यक्ष असल्यापासूनच्या माविनचा सारा इतिहास त्यांनी वाचला. ते एकमेव भ्रष्टाचारी मंत्री असल्याची टीका केली.
गोमेकॉची विश्वजितनी वाट लावली असा आरोप करून माविनही घसरले. शेवटी संतप्त विश्वजित राणेंचा आवाज चढला व प्रकरण हातघाईवर जातेय हे पाहून मंत्री मायकल लोबो यांनी विश्वजितना खुर्चीवर बसवले.
बैठकीत मुख्यमंत्रीही झाले अवाक
वर्षभरात झालेला भाजप मंत्रिमंडळातील हा दुसरा प्रकार आहे. हा प्रकार घडला तेव्हा मुख्यमंत्री व इतर मंत्रीच नव्हे तर मुख्य सचिव व इतर सचिव अधिकारी बैठकीस उपस्थित होते. सारा प्रकार पाहून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेदेखील अवाक झाले.
गुदिन्हो यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे धाव
झाल्या प्रकाराने अवमानीत झालेल्या वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सायंकाळी दिल्ली गाठली. दैनिक तरुण भारतशी बोलताना माविन गुदिन्हो यांनी आपला दिल्ली दौरा यापूर्वीच ठरलेला होता, असे स्पष्ट केले. तरीही ते पक्षश्रेष्ठींच कानावर वरील प्रकार घालणार व त्यासाठीच ते दिल्लीला गेले असावेत असा अंदाज आहे.
वडिलांचा अवमान सहन करणार नाही : विश्वजित
तरुण भारतशी बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की आपल्याला राग सहन झाला नाही. ज्या प्रतापसिंह राणे यांनी राज्यासाठी गेली 48 वर्षे आपले योगदान दिले, मुख्यमंत्रीपदी राहून गोरगरीबांना न्याय दिला, विकासगंगा आणलीस, त्यांचा अवमान आपण कसाच सहन करणार नाही. वादाची सुरुवात मी नाही तर माविननी केली. मी शांत बसून होतो. माविनने अकारण आपल्या वडिलांचा अवमान केला. मी कशाला गप्प बसणार? असा सवाल मंत्री विश्वजित राणे यांनी केला.