नाशिक / प्रतिनिधी
नाशिक येथे होणाऱया 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली. महामंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकाऱयांच्या शनिवारपासून नाशिकमध्ये बैठका झाल्या. यामध्ये अंतिम चर्चेत जयंत नारळीकर आणि भारत सासणे यांच्या नावाची चर्चा झाली. अखेरीस डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावावर एकमत झाले. नाशिक नगरीत 26 ते 28 मार्च दरम्यान होणार आहे.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महामंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाने डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता. यासोबतच विदर्भ साहित्य संघाकडून आलेले भारत सासणे तसेच मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांचे नावदेखील चर्चेत होते. तसेच महामंडळाच्या प्रथेनुसार आयोजक लोकहितवादी संस्थेने नाशिकचे प्रख्यात साहित्यिक मनोहर शहाणे यांचे नाव सुचविल्याने त्यांचे नावदेखील अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. मात्र, महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱयांच्या बैठकीनंतर डॉ. नारळीकर यांचेच नाव निश्चित करण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीत साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, आयोजक लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. नारळीकर यांना भारत सरकारने पद्मभूषण तसेच पद्मविभूष पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. तर राज्य सरकारने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे. विज्ञानकथा, तसेच अनेक विज्ञानविषयक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘चार नगरांतले माझे विश्व’ या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कारानेदेखील त्यांना गौरविण्यात आले आहे