राहुल गांधींचे पेंद्र सरकारवर टिकास्त्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता कपातीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारच्या निर्णयावर थेट टिकास्त्र सोडले आहे. मोदी सरकारने घेतलेला निर्णय हा अमानवीय आणि असंवेदनशील असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. असा निर्णय घेण्याऐवजी सरकारेन बुलेट ट्रेनचा कोटय़वधी रुपयांचा प्रकल्पच का स्थगित केला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. या मुद्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे सरकारवर बोचरी टीका केली आहे. कोटय़वधींच्या बुलेट टेन प्रकल्पाला आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यीकरणसारख्या योजनांना स्थगिती देण्याऐवजी कोरोनाशी दोन हात करणाऱया केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करणे, ही सरकारची भूमिका चुकीची असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.