प्रतिनिधी / नागठाणे
शेतकरी उत्पादक संस्थेच्या माध्यमातुन व्यावसायिक क्षेत्रात शेतकऱ्यांना सुवर्णसंधी आहे आणि हीच संधी ओळखून लिंब (ता.सातारा) येथील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या रिच एग्री फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘शेतकरी मार्ट मॉल’ ( एफ-मार्ट) चे उद्घाटन नुकतेच महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या वनिता गोरे, माजी सभापती जितेंद्र सावंत, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे,म्हसवेचे सरपंच संजय शेलार, लिंबचे सरपंच अँड. अनिल सोनमळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त धीरज कुमार म्हणाले की, महाराष्ट्रातील पहिला शेतकरी मार्ट हा सातारा जिल्ह्यात उभा राहिला आहे. सातारा जिल्हा हा नेहमीच शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात अग्रेसर असतो हे साताराच्या शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले असून रिच एग्री फार्मर प्रोड्युसर कंपनी ही भविष्यात नावाप्रमाणेच ‘रिच’ होईल असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
हा ‘शेतकरी मार्ट’ महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल असे उद्गार जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी काढले. प्रास्ताविकामध्ये संचालक रविंद्र कांबळे यांनी ‘शेतकरी मार्ट’मध्ये ३० फार्मर प्रोड्युस कंपनी, शेतकरी व महिला बचत गट यांनी उत्पादित केलेले निवडक धान्य, कडधान्य, डाळी, लाकडी घाण्याचे तेल, सेंद्रिय गुळ, गुळ पावडर, काकवी, गुलकंद, काजू, बदाम, मसाले, हळद पावडर इत्यादी विक्रीस उपलब्ध असणार असून लवकरच पुढील प्रस्तावित प्रकल्पात एग्री प्रोसेसिंग युनिट, अवजार बैंक, पैक हाऊस, कृषी सल्ला केंद्र, साठवणूक गोडाऊन व कोल्ड स्टोरेज सुरू करणार असल्याचे नमूद केले. यावेळी कंपनीला कृषी सेवा केंद्राचाही परवाना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ, कृषी अधिकारी रविराज कदम, मंडल कृषी अधिकारी संतोष पवार (आरफळ), युवराज काटे (नागठाणे),चंद्रकांत साळुंखे, सुहास यादव (अंगापूर), कृषी पर्यवेक्षक जे. के. पवार, अभिजित जाधव, कृषी सहाय्यक उमा जाधव, सुवर्णा वेताळ तसेच तालुक्यातील कृषी सहाय्यक व पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.