कोरोनामुळे यंदा आषाढीची वारी चुकली असली, राज्यातील जवळपास 15 लाख वारकऱयांनी आपापल्या गावी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. त्यामुळे या वर्षीचा सोहळाही अनेकार्थांनी वैशिष्टय़पूर्ण व वेगळी अनुभूती देणारा असेल. कोरोनाच्या संकटामुळे यंदा पायी वारी रद्द करणे भाग पडले. त्याचबरोबर मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतच संत ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा पार पाडण्यात आला. आता आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला संतांच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा अन्य वाहनाने पंढरपुरात दाखल होतील व आषाढीचा सोहळा पार पडेल. दरवर्षी लाखो वारकरी वारीत सहभागी होतात नि टाळ-मृदंगाच्या नादाने व विठ्ठलनामाच्या गजराने पालखी मार्ग दुमदुमून सोडतात. त्यात खंड पडल्याने वैष्णवांच्या महासागराचे यंदा पंढरीत दर्शन घडणार नाही. तथापि, झाडांच्या, निसर्गाच्या रूपातून हा भावभक्तीचा संगम घडून येणार आहे, हे विशेष. देहू-आळंदी ते पंढरपूर पालखीतळावर झालेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम हेच दर्शवितो. सहय़ाद्री वनराई संस्था, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर तसेच संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज देवस्थानच्या पुढाकाराने वृक्षप्रेमी अभिनेते व सहय़ाद्री वनराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांच्या हस्ते पंढरपुरात असा कार्यक्रम पार पडणे, यातूनच त्यातील नैसर्गिकता ध्यानात येते. झाडामाडांवर उत्कट प्रेम करणाऱया सयाजीरावांचे पर्यावरण क्षेत्रातील काम अतुलनीय असेच राहिले आहे. झाडे लावावीत आणि तितक्याच मायेने, श्रद्धेने जगवावीत, हाच त्यांच्या आयुष्याचा मंत्र. वारकऱयांचा वारीचा नेम जसा चुकत नाही, तशीच सयाजीरावांची वृक्षभक्तीही अजोड. गोपाळ गणेश आगरकर यांनी बोलके सुधारक व कर्ते सुधारक, अशी सुधारकांची व्याख्या केली आहे. आज सर्व क्षेत्रांना अशा बोलभांडांनी विळखा घातल्याने कोलाहल तेवढा माजतो, पीक काही उगवत नाही. सयाजीराव हे मात्र दुर्मीळ अशा दुसऱया म्हणजेच कर्त्या सुधारकांच्या श्रेणीतील. मध्यंतरी पुण्यातील कात्रजमधील जंगलात वणवा पेटताना पाहिल्यानंतर तात्काळ गाडीतून उतरत आपल्या सहकाऱयांच्या मदतीने त्यांनी तो विझवला व त्यानंतरच पुढची वाट धरली. त्यांच्यातील कर्तेपणाची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. बीडमध्ये मागील फेब्रुवारीत रंगलेले पहिले वृक्ष संमेलनही सयाजीरावांच्या संकल्पनेतूनच साकारलेले. या संमेलनाचे वैशिष्टय़ म्हणजे एका वटवृक्षालाच अध्यक्षपदाचा सन्मान देण्यात आला. कोणत्याही वादविवादाविना पार पडलेल्या या संमेलनातून मनामनांची मशागत, बीजारोपण होणे, हेच त्याचे सर्वात मोठे फलित. पर्यावरण, वृक्षलागवडीला एका चळवळीचे स्वरूप प्राप्त करून देणाऱया सयाजीरावांनी पंढरपुरातील कार्यक्रमात मांडलेले विचारही तितकेच मौलिक होत. प्रत्येक वारकऱयाने आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी 11 वा. आपल्या घरासमोर विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड करावी व विठ्ठलदर्शनाची अनुभूती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. ते करताना संत तुकाराम महाराजांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या संतवचनाचा त्यांनी दिलेला दाखला हा केवळ समर्पकच नव्हे तर कालसुसंगतही म्हणता येईल. मागच्या काही दशकात पर्यावरणाच्या पातळीवर आपल्याकडून अक्षम्य हेळसांड झाली आहे. वृक्षांची अनिर्बंध तोड, अतिनागरीकरण, कार्बन उत्सर्जन यामुळे निसर्गचक्रातच बाधा आल्याचे पहायला मिळते. विकासाच्या हव्यासापोटी जीवनवाहिन्या असलेल्या नद्यांच्या गटारगंगा करण्यात आल्या. नैसर्गिक समतोल साधणारे डोंगर पोखरण्यात आले. झाडांची, निसर्गाची जशी म्हणून करता येईल, तशी ओरबाडणूक करण्यात आली. स्वाभाविकच त्याचे दृश्यादृश्य परिणाम अलीकडच्या काही वर्षांत या ना त्या माध्यमातून पहायला मिळतात. आजमितीला अवघे जग कोरोनाशी लढते आहे. या संकटामुळे नागरीकरणाचा विस्फोट, प्रदूषण, अस्वच्छता वा हे प्रश्न निर्माण करणाऱया घटकांच्या मुळाशी जाण्याची कधी नव्हे, इतकी गरज निर्माण झाली आहे. मुळात भारतीय संस्कृतीत निसर्गाला देवत्वाचे स्थान आहे. आयुर्वेद ही भारतीय संस्कृतीनेच जगाला दिलेली देणगी होय. वड, पिंपळ, औदुंबर यासारख्या वृक्षांची पूर्वापार मनोभावे पूजा केली जाते. केवळ फळाच्या अपेक्षेने नव्हे, तर आईच्या ममत्वाने झाडे लावावीत, त्यांची जोपासना करावी, हा मूळ भारतीय संस्कार आहे. किंबहुना, शहरीकरणाच्या झपाटय़ात हा संस्कार वा विचार हळूहळू विरत गेला. आजही जुनीजाणती वा झाडामाडांशी एकरूप होणारी काही माणसे वृक्षराजींसाठी झटताना दिसतात. झाड शेतात, अंगणात असो वा कुंडीत, त्याचे संगोपन करण्याचा लळा, भावना महत्त्वाची; जागा नव्हे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला महान परंपरा आहे. ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगातून निसर्गाचे गुंजन ऐकायला मिळते. संत सावता माळी हे कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।। असे म्हणत निसर्गातच विठ्ठल पाहतात. आज याच समृद्ध परंपरेची पालखी वारकरी पुढे नेत आहेत. माउली, तुकोबांच्या पालखी सोहळय़ासह दिंडय़ा दिंडय़ातील वारकरी यंदा आपल्या गावी वा पालखी मुक्कामाच्या गावात झाडे लावणार आहेत. वारीचा नेम चुकला असला, तरी हरित वारीच्या माध्यमातून तो सिद्धीस नेण्याचा देवस्थान व वारकरी संप्रदायाचा हा उद्देश निश्चितच जगासाठी अनुकरणीय म्हणता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगन्नाथपुरी रथयात्रेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, सहा पुनर्विचार याचिका दाखल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून यात्रेला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सहिष्ष्णुतेची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाने मात्र या दृष्टीने कोणतेही पाऊल उचललले नाही. उलटपक्षी निसर्गात, लतावेलींमध्ये, झाडामाडांमध्येही विठ्ठल भरून राहिल्याचा संदेश देत वारकऱयांची पावले ही किती दूरगामी असू शकतात, हेच दाखवून दिले. फणस जांभूळ ही पिंपरणी । उंच बेहडा कदंब शिवणी ।। रिंगण सजले वारकऱयांचे । उभी विठ्ठले वातावरणी ।। असे कवी बलवंततनय आपल्या कवितेत म्हणतात. हा सगळा पांडुरंग व निसर्गाचा ‘महासमन्वय’च. तो जितका अभूतपूर्व, अवर्णनीय तितकाच विलोभनीय म्हणावा लागेल.
Previous Articleनाग्या घाबरला
Next Article आत्मनिर्भर भारत योजनेतून एमएसएमईला लाभ सुरु
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.