बेळगावला वेठीस धरण्यामागे मेंदू कोणाचा? शिवरायांची विटंबनाही कटाचाच भाग : दंगलीचा थेट फटका बसतोय सर्वसामान्य नागरिकांना
प्रतिनिधी /बेळगाव
गेले दोन दिवस बेळगाव शहर व तालुक्मयात अप्रिय घटनांची मालिकाच सुरू आहे. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात होत असताना शहराच्या शांततेला सुरुंग लागला असून त्यामुळे साहजिकच पोलीस यंत्रणेवर परिस्थिती हाताळण्याचा ताण वाढला आहे. दगडफेक, जाळपोळ, दंगल झाली की त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. मजूर, कष्टकरी व हातावर पोट चालवणारे या परिस्थितीत भरडतात. तरीही अधूनमधून दंगली का घडतात, त्या कोण घडवतात? कोणाच्या फायद्यासाठी त्या घडवल्या जातात? याचा विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची विटंबना केल्यानंतर बेळगाव येथे त्याचे संतप्त पडसाद उमटले. तत्पूर्वी त्याची सुरुवातही बेळगावातूनच झाली. 13 डिसेंबर रोजी महामेळाव्याच्या वेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकण्यात आली. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. दुसऱया दिवशी कोल्हापुरात लालपिवळा पेटविण्यात आला. याचा बदला घेण्यासाठी काही माथेफिरुंनी बेंगळूर येथे शिवरायांचा अवमान केला.
समाजाचे स्वास्थ्य बिघडवण्यात सोशल मिडियाचाही वाटा मोठा
समाजाचे स्वास्थ्य बिघडवण्यात सोशल मिडियाचाही वाटा मोठा आहे. बेंगळूर येथे शिवपुतळय़ाचा अवमान केल्याचा व्हिडियो या माथेफिरुंनी व्हायरल केले. 17 डिसेंबर रोजी बेळगाव येथे शिवरायांच्या अवमानाचा निषेध नोंदविण्यासाठी धर्मवीर संभाजी चौक परिसरात शिवप्रेमी मोठय़ा संख्येने जमले. त्यानंतर शहरातील वेगवेगळय़ा भागात दगडफेक व वाहने पेटविण्याचे प्रकार घडले. या प्रकारानंतर पोलिसांनी मराठी तरुणांना अक्षरशः टार्गेट केले आहे.
कोणत्याही दंगलीत दगडफेक करणारे आणि वाहने पेटविणारे अलगदपणे तेथून निघून जातात. अनेक वेळा भलतेच लोक पोलिसांच्या तावडीत सापडतात. त्याचा फटका विद्यार्थी व तरुणांना बसतो. बेळगावच्या शांततेला सुरुंग लावण्याचे प्रकार अधूनमधून घडतच असतात. राजकीय कारणांसाठी अशांतता निर्माण करण्याचे प्रकार घडत असतात. शांत बेळगावमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी व्यवस्थितपणे प्रयत्न करण्यात येत असून समाजकंटकांच्या या प्रयत्नांना यशही आले आहे.
बेळगावात जातीय व भाषिक तेढ वारंवार निर्माण केली जाते. शिवपुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी शहरातील पुतळय़ांची खबरदारी घेतली असती तर परिस्थिती हाताबाहेर गेली नसती. कनकदास कॉलनी, अनगोळ येथे क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळय़ाची विटंबना करण्यात आली. या पुतळय़ासंबंधी अनगोळ परिसरातील बऱयाच नागरिकांनाच माहिती नाही. तरीही तो शोधून त्याची विटंबना करण्यात आली. यामागे व्यवस्थित षड्यंत्र असल्याचा संशय आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे व्यापार-उद्योगांना फटका बसला आहे. त्यामुळे साहजिकच प्रत्येकाची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. आता कुठे ही चाके सुरळीतपणे चालू लागतात तेच बेळगावात समाजकंटकांनी धुडगूस घातला आहे. शिवपुतळय़ाची विटंबना केल्याप्रकरणी बेंगळूर पोलिसांनी कर्नाटक रणधीर सेनेचा चेतन गौडासह सात जणांना अटक केली आहे. या कटात एकूण 13 जणांचा सहभाग आहे. कोल्हापूर येथे लालपिवळा जाळल्याचा बदला घेण्यासाठी आपण शिवरायांचा अपमान केल्याची कबुली या माथेफिरुंनी बेंगळूर पोलिसांसमोर दिली आहे.
गेल्या सोमवारपासून घडलेल्या एकंदर घटना लक्षात घेता अशांतता माजविण्यामागे कोणाचा तरी सुपीक मेंदू कार्यरत असल्याचा संशय बळावत चालला आहे. राजकीय वर्तुळातही यासंबंधी चर्चा सुरू आहे. कारण केवळ एक ठिकाणी नव्हे तर दोन ठिकाणी शिवरायांच्या पुतळय़ाची विटंबना करून राज्यात अशांतता माजविण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलीस दलाला खडबडून जाग आली आहे.