कूचबिहार हिंसाचारावरून राजकारण -5 शहीद वेदी निर्माण करण्याची घोषणा
पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कूचबिहारचा दौरा केला आहे. येथे शनिवारी झालेल्या गोळीबारात मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची ममतांनी भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी आपले सरकार गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासाठी चौकशी सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच शहीद वेदीचीही घोषणा केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यादरम्यान सीआयएसएफच्या कारवाईत मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची भेट घेत ममतांनी भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. कूचबिहारामध्ये नेत्यांच्या प्रवेशावर घातले गेलेल्या 72 तासांच्या बंदीमुळे मृतांच्या कुटुंबीयांना त्वरित भेटू न शकल्याबद्दल ममतांनी खेद व्यक्त केला आहे.
सीतलकुची येथील कथित पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 5 शहीद वेदी निर्माण करण्यासाठी जमीन शोधण्याची सूचना ममतांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना केली आहे. निवडणुकीनंतर पुन्हा येथे येणार असल्याचे ममतांनी म्हटले आहे. ममतादीनी आम्हाला भेटायला आल्या आणि निवडणूक संपल्यावर मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी आम्हाला आशा दाखविल्या असून आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, असे उद्गार मारले गेलेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबीयाने म्हटले आहे.
कूचबिहारमध्ये सीआयएसएफ जवानांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. आमच्या चौकशीत या निर्घृण हत्येसाठी जबाबदार प्रत्येय व्यक्तीचा शोध घेतला जाणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पहिल्यांदाच मतदान करायला गेलेल्या 18 वर्षीय आनंद वर्मनच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाणार असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या. आनंद वर्मन या हिंसाचारात मारला गेला होता.
आयोगाकडून प्रवेशबंदी
निवडणूक आयोगाची बंदी हटताच ममता बॅनर्जी बुधवारी कूचबिहारमध्ये पोहोचल्या आहेत. यापूर्वी त्यांनी सिलिगुडीमध्ये कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलिंगवरून संवाद साधला होता. ममता बॅनर्जी रविवारीच तेथे जाणार होत्या, परंतु निवडणूक आयोगाने कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या तेथील दौऱयावर 72 तासांची बंदी घातली होती.