नवी दिल्ली / वृत्तसंस्था
या वर्षापासून 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बालदिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. शीखांचे दहावे आणि शेवटचे धर्मगुरु गोविंदसिंग यांच्या दोन पुत्रांच्या अन्यायाविरोधातील बलिदानाचे स्मरण देशाला रहावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ही घोषणा केली आहे.
रविवारी गुरु गोविंदसिंगांचा प्रकाशपर्व दिन होता. या पवित्र दिनाचे औचित्य साधून या निर्णयाची घोषणा करण्यात येत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. गुरु गोविंदसिंग यांच्या बालवयाच्या दोन पुत्रांची 26 डिसेंबर या दिवशी मोगल शेहनशहा औरंगजेब याने भिंतीत जिवंतपणी चिणून क्रूर हत्या केली होती. गोविंदसिंग यांचे दोन्ही पुत्र हुतात्मा झाल्याने शीखांची सर्वोच्च धर्मगुरु नियुक्त करण्याची परंपरा खंडित झाली. कारण गुरु गोविंदसिंग यांना वारस उरला नाही.
साहिबजादा झोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग अशी या दोन वीरपुत्रांची नावे होती. गुरु गोविंदसिंग यांचा जन्म बिहारमधील पटनासाहिब येथे झाला होता. ते शीखांचे दहावे आणि अखेरचे गुरु होते. त्यांना हे सर्वोच्च गुरुपद त्यांच्या वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी मिळाले होते. शीखांचे नववे गुरु तेजबहाद्दर सिंग यांचे ते पुत्र होते. तेजबहाद्दर सिंग यांच्या हौतात्म्यानंतर त्यांची गुरु म्हणून नियुक्त करण्यात आली. गोविंदसिंग यांचा जन्मदिन प्रकाशपर्व म्हणून साजरा होतो.