ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकांची अधिसूचना जारी करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यातील मतदानाची उमेदवारी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून योगी सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे आता पाचपेक्षा जास्त लोक एकाच ठिकाणी एकत्र येऊ शकणार नाहीत.
अतिरिक्त मुख्य सचिव अवनिशकुमार अवस्थी यांनी सर्व जिल्हा दंडाधिकारी, एसपी आणि एसएसपी यांना कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. कोविड-१९ चा संसर्ग लक्षात घेता पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी पाचपेक्षा जास्त लोक जमणार नाहीत. तसेच सार्वजनिक मेजवानीला परवानगी नसेल. कोरोना प्रोटोकॉलचे पालन न केल्यास कठोर कारवाई करा आणि पंचायत निवडणुका अत्यंत काळजीपूर्वक घ्या, असे या आदेशात म्हटले आहे.