कराडच्या कोल्हापूर नाक्यावर आंब्याच्या ट्रकला अपघात
प्रतिनिधी / कराड :
कराडचा कोल्हापूर नाका प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनत असताना तेथील उपाययोजनांच्या फक्त गप्पाच होत आहेत. सोमवारी सकाळी कोल्हापूर नाक्यावर भरधाव आंब्याचा ट्रक उड्डाणपुलास धडकला. चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक धडकून पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील दोघे किरकोळ जखमी झाले.
दरम्यान कोल्हापूर नाक्यावरील अपघातांची मालिका नित्याची झाली असून येथे दररोज हजारो स्थानिक नागरिकांना मृत्यूला चकवा देत प्रवास करावा लागतो. कोल्हापूरकडून आंबे घेऊना जाणारा मालट्रक मुंबईकडे निघाला होता. कराडच्या कोल्हापूर नाक्यावर आल्यावर भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक संगम हॉटेलसमोरील उड्डाणपुलाच्या संरक्षक जाळ्या तोडून पिलरला जोरदार धडकला. भरधाव ट्रक पिलरला धडकून पलटी झाला. ट्रकमधील आंबे उड्डाणपुलाखाली अस्ताव्यस्त पडले.
पोलीस हवालदार खलील इनामदार, प्रशांत जाधव, महामार्ग हेल्पलाईनचे दस्तगीर आगा, अमित पवार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, कोल्हापूर नाक्यावरील अपघात नित्याचे बनले असून येथून प्रवास करताना प्रत्येक वाहनधारकास अक्षरशः मृत्यूला चकवा द्यावा लागतो. मृत्यूला चकवा देण्याच्या प्रयत्नात अनेकांचे हकनाक बळी गेले आहेत तर काहीजण अपघातात गंभीर जखमी होऊन आयुष्यभराचे अपंगत्व येऊन जगत आहेत. कोल्हापूर नाक्यावरील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होत नाहीत हे दुर्दैव आहे. कोल्हापूर नाका हा विषय गंभीरपणे घेऊन तेथील वेगमर्यादेवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न न झाल्यास अपघातांची मालिका किती बळी घेईल अन् कितीजणांना जखमी करेल सांगता येत नाही.