विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन मंडळांच्या संघटनेची मागणी : मुलांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /बेंगळूर
मागील 16 महिन्यांपासून राज्यातील शाळा बंद असल्याने 40 लाख विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहिले आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी विनाअनुदानित शाळा व्यवस्थापन मंडळांच्या संघटनेने (रुप्सा) केली आहे. संघटनेचे अध्यक्ष लोकेश ताळीकट्टे यांनी यासंबंधीचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
शाळांमध्ये ऑफलाईन वर्ग सुरू करण्यासाठी विद्यागम, आळीपाळीने वर्ग भरविणे आदी उपाययोजना करून मुलांचे नियमित शिक्षण सुरू करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांजवळ मोबाईल, इंटरनेट नेटवर्क व ऑनलाईन शिक्षणाच्या इतर सुविधा नसल्याने त्यांच्या निरंतर अध्ययन प्रक्रियेतील सातत्यता खुंटली आहे. याचबरोबर राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. लाखो मुले बालकामगार बनली आहे. मुलांमध्ये मागील वर्षभरापासून कुपोषणाचे प्रमाणही वाढले आहे. मुले शाळेपासून दुरावल्यास आगामी दिवसात अनेक सामाजिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
शाळा सुरू करण्यासाठी आपल्या संघटनेतर्फे अनेकवेळा निवदने देण्यात आली आहेत. तरीसुद्धा राज्य सरकारने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. विद्यागम व इतर पद्धतीने ऑफलाईन वर्ग भरविण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी रुप्साचे अध्यक्ष लोकेश ताळीकट्टे यांनी केली आहे.
डॉ. देवीशेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली समितीचा अहवाल, लान्सेट संस्थेचा अहवाल, निम्हान्स संस्थेच्या तज्ञांची शिफारस, आयसीएमआरच्या तज्ञांनी शाळा सुरू करण्यासंबंधी अहवाल दिले आहेत. तथापि, सरकारने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संसर्ग कमी असलेल्या भागातील शाळा सुरू करण्याची मागणी
देशातील अनेक राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातही 26 जुलैपासून पदवी महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. लस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात आहे. तसेच शिक्षकांनाही प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसी देण्यात आल्या आहेत. कोरोना मार्गसूचींचे पालन करून शाळा सुरू करण्यास परवानगी द्यावी. ज्या भागांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर अत्यंत कमी आहे, अशा भागातील शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे.