खासदार उदयनराजे भोसले मराठा आरक्षण मुद्दावर आक्रमक,
प्रतिनिधी / सातारा
मराठा समाजाला आरक्षणावरुन खासदार उदयनराजेंनी पत्रक काढून आरक्षण द्या नाहीतर विष पिऊन मरु द्या, असे पत्रक काढल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यावर गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे आक्रमक होत विष पिणे सोडाच आता यांनाच विष पाजणार. मराठा आरक्षणासाठी आजवर यांनी काय दिवे लावले ते जनतेला समजू द्या, याबाबतची श्वेतपत्रिकाच काढावी. आरक्षणासाठी राज्य सरकारकडून काहीच होत नसल्यामुळे त्यांना आता मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करावा, असा घणाघात उदयनराजेंनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्याचा आहे. तुम्ही केंद्रावर का ढकलताय. आता राज्य सरकारचे कौतुक बास, कोण काय करतं ते लोक जाणत आहेत. तुमचे वकील तारखेला का उपस्थित राहत नाहीत. ते सुप्रीम कोर्ट आहे. तेथील तारखा एक दिवसाआड मिळत नाही. कोर्टाने दिलेल्या तारखेला तुम्ही म्हणता तयारी झाली नाही. मराठा आरक्षणासंदर्भात श्वेतपत्रिका आणावी, अशी यावेळी उदयनराजेंनी मागणी केली. तुम्ही काय दिवे लावले हे जनतेला कळु द्या. बस्स झालं, आता गळयापर्यंत आले आहे म्हणूनच विष पिणार आहेच, पण सोडा आता, यांनाच विष पाजणार असल्याचे वक्तव्य राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, या पुढचा मार्ग माझ्या हातात राहिलेला नाही. जनतेचा उद्रेक होईल. लोकांनी तुम्हाला निवडून दिलेय, त्यांना सांगा काय केले ते. यांना मूकबधिर शाळेत नाहीतर मेन्टल हॉस्पिटलमध्ये टाकण्याची गरज आहे. मी का आत्महत्या करू, ज्यांच्यामुळे आमच्यावर अत्याचार होतात या लोकांनी वाट लावली. ना मग यांचीच वाट लावून टाका ना. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिले. जगात जात नसती तर निम्यावर भांडण झाली नसती.
मी शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मात्र त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. मराठा आरक्षणाची जबाबदारी सर्वांची आहे. या कोण सत्ताधारी, कोण विरोधक अशी जबाबदारी झटकू नका. खंरतर संगळ्याची जबाबदारी आहे. आम्ही विरोधी पक्षात आहे. तुम्हाला निवडून देणाऱयामध्ये सर्वच समाजाबरोबरच मराठा समाज पण आहे. मराठा समाज जास्त संख्येने आहे. ज्या भावनेने तुम्हाला निवडून देतात. त्यावेळी त्यांची अपेक्षा असते. त्यांना कुठेतरी न्याय द्यावा. ते जर तुम्ही करू शकला नाही. तर काय करायचे या लोकांनी, हे तरी सांगा.