नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागील आठवडय़ापासून देशात कोरोनाचे संकट कमी होताना दिसत आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 87.76 टक्क्मयांवर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 57 हजार 299 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तर 3 लाख 57 हजार 630 रुग्ण बरे झाले आहेत. याचदरम्यान, 4 हजार 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 29 लाख 23 हजार 400 इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, देशात आतापर्यंत लसींचे 18.41 कोटी डोस देण्यात आले आहेत.
देशात आतापर्यंत 2 कोटी 62 लाख 89 हजार 290 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 2 कोटी 30 लाखांहून अधिक जण उपचाराअंती बरे झाले आहेत. तसेच देशात 2 लाख 95 हजार 525 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत सर्वाधिक कोरोना मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे.
देशातील 8 राज्यात 1 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. तसेच अन्य 8 राज्यांमध्ये 50 हजार ते 1 लाख इतके रुग्ण उपचार घेत आहेत. 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 50 हजारांहून कमी रुग्ण असल्याचेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. देशातील 78 टक्के नवे रुग्ण हे सर्वोच्च बाधित असलेल्या 10 राज्यांमध्ये असल्याचेही आकडेवारीतून दिसून येत आहे. या राज्यांपैकी सात राज्यात प्रतिदिन 10 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.