प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात सर्वत्र भिकाऱयांचा सुळसुळाट पसरला असून ही भिकाऱयांची टोळी झारखंड येथील असल्याचे आढळले आहे. रेल्वेच्या दोन बोगी भरुन भिकारी गोव्यात आले आहेत. भीक मागणाऱया या प्रत्येक महिलांकडे मूल असते. ही मुले अपहरण केलेली असू शकतात. या भिकाऱयांच्या व्यवसायाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
पणजीत भीक मागणाऱया या महिलांकडे असलेले एकच मूल प्रत्येक दिवशी वेगवेगळ्य़ा महिलांकडे दिसते. ही मुले नेमकी कोणाची याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. या मुलांकडे जन्मदाखला नाही. आधारकार्डही बनवण्यात आलेले नाही.
स्टॉप चाईल्ड एब्यूज नाव (स्कॅन) नामक बिगर सरकारी एनजीओ संस्था मुलांच्या हक्कासाठी गोव्यात झटत असून या संस्थेच्या संचालक ऑड्री पिंटो यांनी पोलिसांकडे मदत मागितली तरी पोलीस मदत द्यायला तयार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. भिकाऱयांचे जाळे पसरवणारा एजंट आणि पोलिसांचे साटेलोटे असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे कॅनडा येथील निकटवर्तीय राजन पर्रीकर खूप वर्षानंतर गोव्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पणजी शहरातील या भिकाऱयांपासून होणारा त्रास व मांडवी किनारी फुटपाथवर शौचास बसणाऱयांचे फोटो टिपून उच्च न्यायालयाला पाठवले होते. त्यांच्या या फोटोंची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका नोंदवून घेतली होती.
पणजी महापालिकेच्या अधिकाऱयांचे तसेच समाज कल्याण खाते, एनजीओचे प्रतिनिधी व पोलीस यांचे फिरते पथक सदैव तैनात ठेवावे. या भिकाऱयांची धरपकड करुन त्यांनी न्यायदंडाधिकाऱयांसमोर हजर करावे व न्यायदंडाधिकाऱयांच्या आदेशाप्रमाणे त्यांची वृद्धाश्रम, अपनाघर अथवा डिस्ट्रस वूमन सेंटर किंवा इतर ठिकाणी सोय करण्याचा आदेश न्यायपीठाने दिला होता. या आदेशाची अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे एनजीओमार्फत परत जनहित याचिका सादर करण्याची आवश्यकता भासत आहे.
भिकारीमुक्त गोवा
मुलांचे अपहरण करुन त्यांचा वापर भीक मागण्यास करणाऱया या टोळीचा पर्दाफाश करण्याची आवश्यकता चिंबल येथील एनजीओचे प्रतिनिधी मकबूल कलसूर यांनी व्यक्त केली आहे. भिकारीमुक्त गोवा असे अभियान चालवण्याचे त्यांनी ठरवले असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यासाठी (9225906776) या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या मुलाची डीएनए चाचणी व्हावी व ही मुले आपल्या खऱया पालकांकडे पोहोचती करावी यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले.