प्रतिनिधी/ वास्को
लॉकडाऊनच्या भितीने वास्कोत शनिवारी एकच गर्दी उसळली. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी दुकाने खुली राहणार असे आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करूनसुध्दा शहरातील बाजारात लोकांनी कोरोना संसर्ग वाढवणारी गर्दी केली होती. लोकांकडून होत असलेल्या अशा प्रकारामुळे आश्चर्य आणि संतापही व्यक्त होत आहे.
मागच्या शुक्रवारी संपूर्ण गोव्याबरोबरच वास्को शहर व परीसरात लोकांनी लॉकडाऊन पाळला होता. तीन दिवसांच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी दुकाने खुली ठेवण्यात आल्याने लोकांची कोणतीही गैरसोय दिसून आली नव्हती. तसेच भाजी मार्केट व मासळी मार्केट खुले असूनही तेथील व्यवहारांवर ग्राहकांअभावी परीणाम झाला होता. सोमवारी शहरातील सर्व व्यवहार सुरू झाले तरी काहींनी स्वताहुन बंदच ठेवले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्बंध अधिक कडक केल्याने बुधवारपासून पुन्हा शहरातील भाजी मार्केट, मासळी मार्केट व भुसारी दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहिले. वास्कोतील रस्त्यांवरसुध्दा मोजक्याच प्रवासी बसगाडय़ा प्रवाशांची सेवा बजावत आहेत. त्यातही कोरोना संसर्गाचा गंभीर धोका दिसून येत आहे. काल शनिवारपर्यंत हीच स्थिती होती. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आज रविवार कर्फ्यु लावला जाणार असल्याच्या वृतामुळे मात्र, लोकांमध्ये खळबळ उडाली. सकाळी दुकाने उघडल्यापासून दुपारपर्यंत शहरातील फळभाजी मार्केट व किराणी दुकानांसमोर तसेच बागायत बाजार व सहकार भांडार यांच्या दुकानांबाहेर एकच गर्दी उसळली होती. संध्याकाळीही काही प्रमाणात असेच दृष्य होते. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी उडालेल्या या गर्दीमुळे वाहनांची वर्दळही मोठय़ा प्रमाणात वाढली.
आजपासून पंधरा दिवस गोव्यात कर्फ्यू लावला जाणार असला तरी मुख्यमंत्र्यांनी सकाळी सातपासून दुपारी एक वाजेपर्यंत जीवनावश्य वस्तूंच्या वितरणासाठी दुकाने खुली असतील असे जाहीर केलेले असतानाही लोकांनी खरेदीसाठी केलेली गर्दी पाहता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा अर्थ लोकांना समजलाच नाही की मुख्यमंत्र्यांवर जनतेचा विश्वास नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाची सांखळी तोडण्यासाठी सरकार काही दिवसांचा लॉकडाऊन किंवा पंधरा दिवसांचा कर्फ्यू लावण्याचा खटाटोप करीत असले तरी शनिवारी बाजारपेठेत पडलेल्या गर्दीमुळे भिती निर्माण झालेली आहे. या प्रकारामुळे कोरोनासंबंधी दक्षता बाळगणाऱया लोकांमध्ये संताप पसरलेला आहे.