परिवहन महामंडळ विभागाची माहिती : गतवषीही 110 कोटीचे नुकसान, दोन महिने बससेवा ठप्प, कर्मचाऱयांचे वेतन देणेदेखील कठीण
प्रतिनिधी / बेळगाव
संप व लॉकडाऊनमुळे परिवहनची बससेवा दोन महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प झाली होती. स्थानिक बससेवेबरोबर जिल्हय़ांतर्गत व आंतरराज्य बससेवा बंद राहिल्याने परिवहनचे प्रचंड नुकसान झाले आहे. लॉकडाऊन काळात सर्वच क्षेत्रांना फटका बसला असून याला परिवहन मंडळदेखील अपवाद नाही. संप आणि लॉकडाऊन काळात बेळगाव विभागाला तब्बल 45 कोटींचा फटका बसला आहे, अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
एप्रिल महिन्यात परिवहनच्या कर्मचाऱयांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. त्यामुळे पंधरा दिवस बससेवा ठप्प झाली होती. दरम्यान, परिवहनला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला होता. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातल्याने लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्यामुळे पुन्हा बससेवा ठप्प झाली. त्यामुळे परिवहनचा महसूल थांबला. परिणामी परिवहनला कर्मचाऱयांचे वेतन देणेदेखील कठीण झाले होते. त्यामुळे कर्मचाऱयांच्या वेतनासाठी शासनाने आर्थिक मदत केली आहे.
चार आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल व खानापूर या सात आगारांतून बेळगाव विभागाला मोठय़ा प्रमाणात महसूल जमा होतो. बसच्या माध्यमातून विभागाला दैनंदिन 70 ते 80 लाखांचे उत्पन्न मिळते. शिवाय बेळगाव जिल्हय़ाला महाराष्ट्र व गोवा राज्य लागून असल्याने आंतरराज्य प्रवासासाठी धावणाऱया बसेसची संख्या अधिक आहे. त्यामुळे एकूण उत्पन्नापैकी महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून 40 टक्के उत्पन्न मिळत असते. सध्या राज्यांतर्गत बससेवा सुरू असली तरी महाराष्ट्रात धावणाऱया बसेस बंद आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न थांबले आहे.
संप व लॉकडाऊनमुळे परिवहनची बससेवा बऱयाच काळासाठी बंद होती. परिणामी परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला होता. दरम्यान कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे परिवहनला राज्य सरकारची मदत घ्यावी लागली. दरम्यान कर्मचाऱयांचे एप्रिल महिन्याचे वेतनही उशिराने झाले होते. मात्र आता परिवहनची बससेवा पूर्ववत सुरू झाल्याने उत्पन्न वाढीसाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पहिल्या कोरोनाच्या लाटेत 110 कोटींचे नुकसान
गतवर्षीच्या पहिल्या कोरोनाच्या लाटेत बेळगाव विभागाला 110 कोटींचा फटका बसला होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवषी मार्च महिन्यापासून बससेवा ठप्प झाली होती. त्यानंतर सुरू झालेल्या बससेवेला देखील प्रवाशांचा प्रतिसाद म्हणावा तसा मिळाला नाही. दरम्यान, मिळणाऱया उत्पन्नातून डिझेलचा खर्चही भागणे कठीण झाले होते. त्यामुळे वर्षभर बससेवा तोटय़ातच सुरू राहिली. परिवहनने उत्पन्न वाढीसाठी कार्गो सेवा सुरू केली. मात्र काही दिवसांतच दुसऱया लाटेने थैमान घातल्याने या सेवेवर परिणाम झाला.
बस थांबल्याने महसूलदेखील थांबला
संप आणि लॉकडाऊनमुळे बससेवा ठप्प झाल्याने विभागाला 45 कोटींचा फटका बसला आहे. गतवर्षीदेखील परिवहनला प्रचंड प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे. लॉकडाऊनमुळे बस जाग्यावर थांबून असल्याने महसूलदेखील थांबला आहे. त्यामुळे परिवहनसमोर अडचणी वाढल्या आहेत.
के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी, केएसआरटीसी)