प्रतिनिधी / काणकोण
काणकोण तालुक्यातील लोलये पंचायत क्षेत्राचा अर्धा भाग मागच्या दोन दिवसांपासून अंधारात असून वादळी वाऱयाच्या माऱयामुळे भगवती पठारावर मोठय़ा प्रमाणात झाडे कोसळल्याचा हा परिणाम असल्याची माहिती वीज खात्याकडून देण्यात आली.
1969 साली ज्यावेळी काणकोण तालुक्यात पहिल्यांदा वीज आली त्यावेळी भगवती पठारावरून वीजवाहिन्या नेण्यात आल्या होत्या. मात्र मागच्या 50 वर्षांत या वीजवाहिन्या तसेच खांबे बदलण्याचे काम वीज खात्याकडून झालेले नाही. दाट झाडीमुळे या भागात वीजवाहिन्यांवर पावसाळय़ात झाडे कोसळत असतात. त्यामुळे कुळटी वीज उपकेंद्राहून माशे बाजारातून श्री निराकार देवालयाजवळून नवीन वीजवाहिन्या नेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र अवघ्या 100 मीटर अंतरातील काम खोळंबून ठेवण्यात आल्याचा परिणाम लोलयेचे ग्रामस्थ भोगत असल्याच्या तक्रारी आहेत.
दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होतानाच या परिसरातील शालेय मुलांवर त्याचा परिणाम झाला असल्याची माहिती एक नागरिक विशांत प्रभुगावकर यांनी दिली. या परिसरात तीन माध्यमिक शाळा, एक उच्च माध्यमिक शाळा आणि प्राथमिक शाळा असून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कनेक्टिव्हिटीवर परिणाम होऊन हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेऊ शकले नाहीत. 100 मीटर अंतरातील वीजवाहिनीसाठी माशे येथील एका खांबावर तारा बांधून ठेवण्यात आल्या आहेत. यासंबंधी साहाय्यक वीज अभियंत्यांशी चर्चा करण्यात आली होती. मात्र हे काम पुढे जाऊ शकले नाही. त्याचा परिणाम लोलयेवासीय भोगत असल्याचे मत प्रभुगावकर यांनी व्यक्त केले.