वाहनचालकांमध्ये संतापाची लाट : मुख्य रस्ता असल्याने नव्याने करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव मुख्य रस्त्याची नाझर कॅम्पजवळ चाळण झाली आहे. तरीदेखील त्याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. ‘तरुण भारत’मधून रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेवर प्रकाश टाकताच दुसऱयाच दिवशी खडी टाकून तात्पुरत्या मलमपट्टीचा प्रयत्न करण्यात आला. परंतु यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून नव्याने रस्ता करण्याची मागणी होत आहे.
यावषीच्या पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यांची दाणादाण उडवून दिली. निकृष्ट प्रतीचे साहित्य वापरून रस्ते केल्याने आता उखडू लागले आहेत. त्यामुळे शहरात खड्डय़ांचे साम्राज्य पसरले असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. नाझर कॅम्प येथे पावसात खड्डय़ांमधून वाहने चालविणेही कठीण होत आहे. रात्रीच्यावेळी ते निदर्शनास न आल्याने अनेक अपघातही घडत होते. या समस्येवर ‘तरुण भारत’ने आवाज उठविताच दुसऱयाच दिवशी ते खड्डे खडीने भरण्यात आले.
परंतु पुन्हा मोठा पाऊस झाल्यास ही खडी उखडून जाणार आहे. त्यामुळे पुन्हा वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या ऊन पडले असून हा रस्ता करण्याची मागणी करण्यात येत आहे. मुख्य रस्ता असल्याने दररोज हजारो वाहने या मार्गावरून जातात. याचा विचार करून हा रस्ता करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
इतर रस्ते चकाचक,मग हा रस्ता का नाही?
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येत आहे. ज्या भागात जास्त रहदारीही नसते त्या भागात चकाचक रस्ते केले जात आहेत. परंतु दररोज हजारो वाहने जाणाऱया वडगाव-येळ्ळूर रस्त्यावर खड्डे पडूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे इतर रस्ते चकाचक करत असताना हा मुख्य रस्ता का केला जात नाही, असा संतप्त प्रश्न वाहनचालक व स्थानिक रहिवासी उपस्थित करीत आहेत.