लक्षावधी लोकांची उपस्थिती : सातव्या आणि अंतिम टप्प्याआधी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार
उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आता सातव्या आणि अंतिम टप्प्याकडे वाटचाल करू लागली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचारासाठी आपले सर्व सामर्थ्य उपयोगात आणले असून जाहीर सभा, रोड शो, मतदारांच्या गाठी-भेटी आणि कोपरा सभा मोठय़ा संख्येने घेण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला लोकसभेचा मतदारसंघ वाराणसी येथे अतिभव्य रोड शो केला. यात शहर व आसपासच्या परिसरातून लक्षावधी नागरिक समाविष्ट झाले. उत्तरप्रदेशच्या यावेळच्या विधानसभा निवडणुकीचा परिणाम आताच निश्चित झाला असून भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा घवघवीत यश मिळणार आहे. उत्तर प्रदेशच्या मतदारांनी योगी आदित्यनाथ यांचीच पुन्हा निवड केली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मतदानाच्या सातव्या टप्प्यात 54 मतदारसंघांमध्ये 7 मार्च या दिवशी मतदान होणार आहे. या मतदारसंघांपैकी 11 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी तर दोन मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. या टप्प्यात भाजप आणि सप या मुख्य पक्षांबरोबरच त्यांच्या मित्र पक्षांचाही कस लागणार आहे. या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये अन्य मागासवर्गीय, दलित आणि अतिमागासवर्गीय मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांच्याच हाती प्रामुख्याने सूत्रे राहणार आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीतजास्त संख्येने आपल्याकडे आकृष्ट करून घेण्याची स्पर्धा सुरू आहे.
मतदारसंघांची नावे
या टप्प्यात अत्रौलिया, गोपालपूर, सगदी, मुबारकपूर, अझमगड, निजामाबाद, फुलपूर-पोवई, गिदारगंज, लालगंज (अनुसूचित जाती), मेहनगर (अनुसूचित जाती), मधुबंद, गोशी, मोहम्मदाबाद-गोहना (अनुसूचित जाती), मऊ, बदलापूर, शाहगंज, दाजीपूर, जांगीपूर, झरुराबाद, मोहम्मदाबाद, झमानिया, मुगलसराई, सकलदिहा, सैदाराजा, चाकिया (अनुसुचित जाती), पिंडरा, अजगारा (अनुसुचित जाती), शिवपूर, रोहानिया, वाराणसी उत्तर, वाराणसी दक्षिण, वाराणसी छावणी, सेवापुरी, भदोही, गँगपूर, औराई (अनुसुचित जाती), छानबे (अनुसुचित जाती), मिर्झापूर, मजहावन, चुनार, मदिहान, भोरवाल, राबॅर्टस्गंज, ओब्रा (अनुसुचित जमाती) आणि दुद्धी (अनुसुचित जमाती) या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
आज प्रचार थांबणार
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार आज शनिवारी थांबणार आहे. सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या सर्व मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यानंतर 10 मार्च या दिवशी, अर्थात येत्या गुरुवारी विधानसभा निवडणूक झालेल्या सर्व पाच राज्यांमध्ये मतगणना होणार आहे. दुपारी तीनपर्यंत सर्व राज्यांमध्ये चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. त्याआधी 7 मार्चलाच विविध सर्वेक्षण संस्था आपल्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे निष्कर्ष प्रसिद्ध करणार आहेत. या निष्कर्षांमधून 10 मार्चचे चित्र कसे असेल, याची काहीशी कल्पना सर्वांना येऊ शकणार आहे.
मतदान जवळपास समान
आतापर्यंतच्या 6 टप्प्यांमध्ये झालेले मतदान जवळपास 2017 च्या विधानसभा निवडणूकी इतकेच आहे. मतदारांमधील उत्साहही जवळपास समान प्रमाणात दिसून आला. असे प्रत्यक्षदर्शी जाणकारांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला 403 पैकी 325 जागांवर विजय मिळाला होता. यावेळी सपने भाजपसमोर आव्हान निर्माण केल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मुख्य चुरस या दोन पक्षांमध्येच होणार असून बसप आणि काँग्रेस हे स्पर्धेत कोठेही दिसत नसल्याचेही बोलले जाते.
सर्वांनाच विजयाची अपेक्षा
आतापर्यंत झालेल्या 6 टप्प्यांच्या मतदानांमध्ये आपल्या पक्षाचा विजय निश्चित झाला आहे, असे प्रतिपादन भाजप, सप आणि बसप या पक्षांनी केले आहे. काँग्रेसनेही आपली परिस्थिती मोठय़ा प्रमाणात सुधारेल, असा दावा केला आहे. तथापि मतदार सातव्या टप्प्यात कोणाला कौल देतील आणि आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये त्यांनी कोणाच्या पारडय़ात वजन टाकले आहे, हे 10 मार्चलाच समजणार आहे.