प्रतिनिधी / मडगाव
भाजप सरकारातून काढून टाकल्याने फातोर्डाचे आमदार विजय सरेदसाई हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. सद्या ते बेताल विधाने करीत आहेत. फट, फटींग, फटींगपणा त्यांनी चालविला असल्याची जोरदार टीका प्रदेश भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
प्रत्येक माणसाला एक मर्यादा असते. या मर्यादाच्या पलिकडे माणूस पोचला की, लोकांना देखील त्यांचा कंटाळा येत असतो आणि आमदार विजय सरदेसाईच्या संदर्भात असेच घडत आहे. एकच गोष्ट वारंवार सांगितली की, लोकांना ती खरी वाटणार असा कदाचित त्या व्यक्तीचा समज असतो. परंतु, खोटी गोष्ट करण्यासाठीच हा खटाटोप असल्याचे लोकांना कळून चुकते. विजय सरदेसाई हे सुद्धा एकच गोष्ट वारंवार सांगून ते सत्य असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करीत असले तरी जनता आत्ता सूज्ञ झालेली आहे. त्यामुळे त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात कितीही आटापीटा केला तरी लोक त्याला बळी पडणार नसल्याचे दामू नाईक म्हणाले.
विजय सरदेसाई हे सद्या पत्रकार परिषदा घेऊन सरकारच्या विरोधात बेताल विधाने करीत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ते लक्ष करतात. त्यांनी आपली बेताल विधाने थोडय़ा दिवसांसाठी थांबवावी व थोडे दिवस विश्रांती घ्यावी व नंतर स्वता आत्मपरिक्षण करावे असा सल्ला दामू नाईक यांनी त्यांना दिला आहे.
गेल्या चार वर्षात केवळ ‘चिकनेरी’च गेलीय
भाजप सरकारात मंत्री व नंतर उपमुख्यमंत्री झालेल्या विजय सरदेसाई यांनी गोव्यातील जनतेकडे तसेच फातोर्डा मतदारसंघातील नागरिकांकडे केवळ चिकनेरीच केलेली आहे. फट, फटींग, फटींगपणा केल्याचा आरोप देखील श्री. नाईक यांनी केला. सरकारातून काढून टाकल्यानेच सरदेसाई हे भाजप सरकारवर आरोप करीत आहेत. भाजप संपणार असल्याची विधाने करतात, पण, भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून तो संपण्याची स्वप्ने विजय सरदेसाई यांनी पाहू नये, सद्या त्यांच्याकडे कोणताच काम-धंदा नाही. त्यामुळे बेताल विधाने करत सुटल्याचे श्री. नाईक म्हणाले.
पालिका आरक्षण संदर्भात सरकारने योग्य तेच केलेले आहे. लोकशाही व घटणेला धरून आरक्षण केले आहे. त्यावर सरदेसाई हे टिप्पणी करतात ती निषेधार्थ आहे. सरकारला उच्च न्यायालयाचा आदेश मान्य नसल्यानेच सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ते सुद्धा कायद्याला धरूनच आहे. पण, विजय सरदेसाई हे लोकांची दिशाभूल करतात ते यशस्वी होणार नसल्याचा दावा करण्यात आला.
विजय सरदेसाई हे भाजप सरकारात मंत्री असताना, त्यांनी आरक्षण किंवा अन्य गोष्टी संदर्भात काहीच केले नाही. उलट त्यांनी स्वताचा स्वार्थ साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला. लुटमार केली व त्या लुटमारीतून फातोडर्य़ात भव्य असे कार्यालय बांधले व पणजी शहरात भव्य कार्यालय घेतले. त्याच बरोबर मळकर्णे येथे फार्म हाऊस सुरू केले. त्यावर कोटय़ावधी रूपये खर्च केल्याचे दामू नाईक म्हणाले. यावर त्यांनी अगोदर भाष्य करावे व जनतेला हा कोटय़ावधी रूपया कुठून आला हे देखील सांगावे असे श्री. नाईक म्हणाले.
या पत्रकार परिषदेला मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, फातोर्डा मंडळाचे मनोहर बोरकर इत्यादी उपस्थितीत होते.