पंतप्रधान मोदींचा भाजपच्या केंद्रीय नेत्यांना संदेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नुकत्याच झालेल्या चार राज्यांमधील आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घ्या असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी नेते हे काम करीत आहेत, अशी माहितीही देण्यात आली.
आसाममध्ये सत्ता टिकविण्यात भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यश आले आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुमताच्या जवळपास जाण्यातही अपयश आले असले तरी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळाले आहे. पुदुच्चेरीत इतिहासात प्रथमच सत्ताधारी गटात पक्ष म्हणून बसण्याची संधी मिळाली तर तामिळनाडू आणि केरळमध्ये मात्र पराभव पत्करावा लागला.
रविवारी येथे भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा व इतर नेते उपस्थित होते. ही बैठक नड्डा यांच्या निवासस्थानीच झाली होती. भाजपच्या या पाचही प्रदेशांमधील कामगिरीचा आढावा या बैठकीत घेण्यात आाला. याच बैठकीत पंतप्रधान मोदींनी हा संदेश दिला.
तळागाळापर्यंत पोहचा
ज्या ठिकाणी पक्ष कमजोर आहे तेथे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करावेत असे ठरविण्यात आले. सघंटन मुख्य सचिव बी. एल. संतोष आणि संघटन सहसचिव शिव प्रकाश यांनी त्यांचे विचार मांडले. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे संख्याबळ वाढले आहे. पुदुच्चेरीमध्ये प्रथमच चांगल्या संख्येने आमदार निवडून आले आहेत, मात्र केरळमध्ये पक्षाला एकही विजय मिळाला नाही. तरीही मते पूर्वीइतकीच मिळाली आहेत. मात्र, ज्या राज्यांमध्ये भाजप बळकट नाही तेथे विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. बैठकांचे सत्र सुरू राहणार आहे.