दंडात्मक कारवाईत ५ लाख रुपयांचा दंड वसूल
प्रतिनिधी / वाई
सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनो रोगाने पुन्हा डोके वर काढण्याला सुरुवात केली असल्याने त्याचा प्रादुर्भाव वाई तालुक्यामध्ये होऊ नये त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वाई पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी आपले पोलीस दल सज्ज ठेवून वाई शहरासह अनेक ठिकाणी पोलीस पथके तयार करून मास्क न लावता फिरणा-या बेजबाबदार नागरिकांच्यावर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. पोलिसांनी गेल्या दोन दिवसात ४ लाख ३७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून शासनाच्या तिजोरीत भरले आहेत. अशी माहिती वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या पाच ते सहा दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये कोरोनो रोगाच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत असल्याने त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाई तालुक्यात पसरू नये याची गंभीर दखल घेऊन वाई शहरातील किसन वीर चौक, गणपती मंदिर, भीमनगर तिकाटणे अश्या या गर्दीच्या रस्त्यांवर पोलीस पथके तैनात करून तालुक्यातील दुचाकी, चारचाकीमधून प्रवास करणा-या विनामास्क नागरिकांवर पथकामार्फत करडी नजर ठेवून मास्क न लावणा-यांना हेरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे काम वाई पोलीस दलातील जवानांनी वेगाने सुरु केले आहे. गेल्या आठ महिन्यापासून नागरिकांच्या बेजाबदारपणामुळे वाई शहरासह तालुक्यामध्ये कोरोनो रोगाने थैमान घातले होते.
त्यामध्ये अनेक लोक बाधित झाल्याने त्याचा फटका त्यांच्या कुटुंबियांना बसला तर अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामध्ये पोलीस जवानांचाही समावेश होता. वाई तालुक्यात कोरोनोमुळे शेकडो जणांचा मृत्यू होऊन देखील याच्यातून जे वाचले आहेत. त्यांनी स्वतःचा व कुटुंबाचा जीव वाचविण्यासाठी बोध घेणे आवश्यक असताना देखील आज तालुक्याच्या खेडोपाडी व वाई शहरात जिल्हाधिका-यांनी मास्कचे बंधन व समांतर अंतराचे आदेश दिलेले असताना देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी व वाई महसूल व पोलीस प्रशासनाने काढलेल्या आदेशाची नागरिकांनी पायमल्ली केली.
पोलीस दलाला कुठल्याही नागरिकाला जाणीवपूर्वक दंडात्मक कारवाई करण्याची हौस नसून प्रत्येक नागरिकांनी नियम पाळल्यास पोलीस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतील का ? पण दुर्दैवाने वाई तालुक्यामध्ये पोलिसांना कारवाईसाठी रस्त्यावर उभे रहावे लागते ही आजची शोकांतिका आहे. बेजबाबदार नागरिकांच्याकडून गेल्या २ दिवसात जवळपास आज अखेर ५ लाख रुपयांचा निधी दंडात्मक कारवाई करून पोलीस खात्याने जमा केला आहे. नागरिकांनी अजूनही नागरिकांनी स्वतः जबाबदारीने वागावे व कोरोनोचा संसर्ग टाळावा असे आवाहन वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी केले आहे.