ग्राहक पंचायतची राज्य शासनाकडे मागणी
प्रतिनिधी / वैभववाडी:
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तसेच इतर वीज कंपन्या गेल्या काही वर्षांपासून वीज- मूल्याची दुप्पट दराने आकारणी करीत आहेत. सध्या कोरोनाच्या संकट काळात अनेकांची कमाई कमी, तर काहींची बंद झाली आहे. त्यामुळे एप्रिल 2020 पासून पुढे सहा महिन्यांपर्यंत 300 युनिटपर्यंत ग्राहकांना सरसकट 50 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी ग्राहक पंचायतच्यावतीने राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) तसेच राज्यातील अन्य वीज वितरण कंपन्या गेल्या काही वर्षांपासून सहकार क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्रातील काही ग्राहकांकडून वीज बिलाची वसुली काही कारणास्तव करू शकलेली नाही. त्यामुळे कोटय़ावधी रुपयांची थकबाकी तशीच आहे. आता मात्र अनावश्यक वीज दरवाढ करून अन्य ग्राहकांकडून प्रत्यक्ष वीज वापर मूल्यापेक्षा दुप्पट दराने आकारणी करीत आहे. ‘कोरोना’सारख्या सध्याच्या वैश्विक संकट काळात अनेकांचे उद्योग, व्यापार बंद पडले. अनेकांना आपल्या नोकऱया गमवाव्या लागल्यात. ज्यांच्या नोकऱया टिकून आहेत, त्यांच्या पगाराची शाश्वती नाही. त्यामुळे अशा सर्व वर्गातील ग्राहकांसाठी एप्रिल 2020 पासून पुढे किमान सहा महिन्यांपर्यंत त्यांच्या एकूण मासिक वीज बिलापैकी 300 युनिटपर्यंत कंपन्यांना देय असलेल्या रक्कमेवर सरसकट 50 टक्के सवलत सर्व ग्राहकांना देण्यात यावी, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आली आहे.