अनेक शहरांमध्ये ‘ट्री गार्ड’ मध्ये जखडलेली झाडे आपल्याला दिसून येतात. झाडांची बेकायदा तोड केली जाऊ नये यासाठी त्यांना लोखंडी सळय़ांच्या ट्री गार्डमध्ये संरक्षित करण्याची पद्धत सर्वत्र वापरली जाते. तथापि ट्री गार्डमुळे झाडांची वाढ खुंटते. अशा झाडांना ट्री गार्डच्या कारावासातून मुक्त करण्याचे काम निवृत्त पोलीस इनिस्पेक्टर महेश चंद्र यांनी करवून दाखविले आहे.
महेश चंद्र यांनी निवृत्तीनंतर वृक्षांच्या सुरक्षेचा उपक्रम सुरू केला आहे. सर्व सजीवांना ऑक्सिजन देणाऱया झाडांना जकडून ठेवणे त्यांना क्रूरपणाचे वाटते. ट्री गार्डमुळे झाडांचे संरक्षण होते ही गैरसमजूत असल्याचे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. उलट टी गार्ड झाडांच्या मुक्तवाढीला अडथळा ठरतात. त्यामुळे अशी टी गार्डस् काढून टाकावीत आणि झाडांची वाढ विनासायास होऊ द्यावी, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला केली. पंतप्रधान कार्यालयाने ही गांभीर्याने घेतली. आणि टी गार्डने जकडलेल्या देशभरातील सर्व झाडांना स्वातंत्र्य देण्याचा आदेश काढला. त्यामुळे आता आपल्याला श्वासासाठी ऑक्सिजन पुरविणारी ही झाडे स्वतः मोकळा श्वास घेऊ लागली आहेत. महेश चंद्र यांच्या कल्पकतेचे कोतुक होत आहे. उत्तराखंड या राज्यात सर्व टी गार्डस् काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे वृक्षांना स्वातंत्र्य देणारे हे पहिले राज्य ठरल्याचा दावा करण्यात येत आहे.