प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला पूर्णता अपयश आले आहे. शहरातील विविध भागात कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. कुत्र्याच्या हल्यात लहान मुले जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. पण जबाबदारी टाळण्यासाठी कुत्र्याची नसबंदी करण्याचा बागुलबुवा करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आरोग्य विभागाने चालविला असल्याची टीका नागरिक करीत आहेत.
शहरातील बहुतांश पसिरातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या समस्येमुळे अक्षरश: वैतागले आहेत. नागरिक आणि लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटना महापालिका प्रशासनाला नव्या नाहीत. पण शाळकरी बालकांसह नागरिकांचे जीव धोक्यात येऊनही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. फक्त कुत्र्याच्या नसबंदीचा उपक्रम हाती घेऊन कारवाई केल्याचा फार्स केला जातो. पण प्रत्यक्षात मोहिमेचा उपयोग होतो का याचा विचार केला जात नाही. यामुळे भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाला केव्हा जाग येणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. माणसापेक्षा कुत्र्याचा जीव महत्त्वाचा झाला आहे.
नार्वेकर गल्ली, रिसालदार गल्ली, कावेरी कोल्ड्रिंक्स परिसरात दहा ते बारा कुत्र्यांचा कळप फिरत असून नागरिकांच्या आणि जनावरांच्या अंगावर हल्ले करण्याचे प्रकार सुरू आहेत. कळपामधील काही कुत्री पिसाळलेली असल्याची माहिती नागरिकांकडून उपलब्ध झाली आहे. गेल्या काही दिवसापासून असंख्य नागरिक व लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असल्याची तक्रार होत आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले असल्याने याबाबतची नोंद सरकार दप्तरी झाली नाही. भटक्मया कुत्र्यांनी शहरातील विविध परिसरात अक्षरक्ष: उच्छाद मांडला आहे. पण याबाबत महापालिकेकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
दरवर्षी कुत्र्याची नसबंदी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने लाखोचा निधी खर्ची घातला जातो. कुत्र्याचा उपद्रव वाढल्यानंतरच नेमकी ही मोहीम हाती घेतली जाते. अन्यथा महापालिकेच्यावतीने कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष अशी कोणतीच मोहीम हाती घेतली जात नाही. यामुळे महापालिकेच्या मोहिमेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. शहर आणि उपनगरात पस्तीस हजारहून अधिक भटकी कुत्री असल्याचा अंदाज आहे. मात्र महापालिकेच्यावतीने दरवर्षी फक्त चार ते पाच हजार कुत्र्याची नसबंदी केली जाते. यामुळे उर्वरीत कुत्र्याच्या नसबंदीबाबत महापालिका कोणती कारवाई हाती घेत नाही.
फक्त मोजक्मयाच कुत्र्याची नसबंदी करून कुत्र्याचा उपद्रव कमी होणार आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या रात्रीच्यावेळी घरामधून बाहेर पडणे मुष्किल बनले आहे. दिवसा गायब राहणारी कुत्री रात्र होताच बाहेर येऊन रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांवर हल्ला करीत असल्याचा प्रकार नार्वेकर गल्ली परिसरात घडत आहे. रात्री नऊनंतर खडे बाजार पोलीस स्थानकासमोर जाताना सदर कुत्री पादचारी व वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. रात्रपाळी करून घरी जाणाऱया नागरिकांना भटक्मया कुत्र्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
भटक्या कुत्र्याची संख्या वाढण्यास शहरातील मांसाहारी हॉटेल कारणीभूत आहेत. हॉटेलमधील कचरा कुंडीत टाकण्यात येऊ नये, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. पण याकडे हॉटेल चालक आणि मालकांनी दुर्लक्ष केले आहे. मांसाहारी हॉटेलामार्फत कचरा कुंडीत कचरा टाकण्यात येतो. यामध्ये उरलेले अन्न आणि हाडे असतात यामुळे भटक्या कुत्र्याची चंगळ होते. परिणामी शहरात भटक्मया कुत्र्याची संख्या फोफावत आहे.