विकासकामांना विरोध करण्याऐवजी साथ देण्याची मागणी : पर्यावरणप्रेमींबद्दल जनतेत आक्रोश
प्रतिनिधी / कारवार
जिल्हय़ातील बहुचर्चित शिरसी-कुमठा रस्ता कामाला सुरुवात झाली असतानाच पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्याने पर्यावरणप्रेमी लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य जनतेच्या निशाण्यावर आले आहेत. पर्यावरणप्रेमी विकासाच्या आड येत असल्याने प्रगतीत जनतेकडून परिसरप्रेमींच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. याचे प्रत्यंतर शनिवारी शिरसी तालुक्यात पहायला मिळाले. शिरसी येथील शिरसी-कुमठा रस्ता विकास मंच, शिरसी स्वतंत्र जिल्हा संघर्ष समितीसह अन्य संघटनांच्या पदाधिकाऱयांनी ‘अम्मीनळ्ळी’ येथे रास्ता रोको केला आणि शिरसी कुमठा रस्ता उभारणीच्या कार्यालयातील अडथळे तातडीने दूर करण्याची मागणी केली.
शिरसी-कुमठा रस्ता विकास मंचचे अध्यक्ष सुब्रमण्यम हेगडे म्हणाले, कारवार जिल्हय़ाच्या विकासात नेहमीच अडथळे बनून राहिलेले पर्यावरणप्रेमी ढोंगी आहेत. ते पर्यावरणवादी नव्हे तर पर्यावरण व्याधी बनून राहिले आहेत. अशा स्वार्थी पर्यावरणप्रेमींपासून दूर राहिले पाहिजे. पर्यावरणप्रेमींचा जिल्हय़ातील पायाभूत सुविधा उभारणीला विरोध करणे ही निषेधार्थ बाब आहे. पर्यावरणप्रेमींनी जिल्हय़ातील विकासाला विरोध करण्याऐवजी साथ द्यावी, असे आवाहन पुढे हेगडे यांनी केले.
घाटमाथ्यावरील तालुक्याशी जोडणारा प्रमुख रस्ता
जिल्हय़ाच्या किनारपट्टीवरील मध्यभागातून घाटमाथ्यावरील शिरसी, सिद्धापूर, मुंदगोड तालुक्याशी व हावेरी, बेंगळूरला जोडणारा शिरसी-कुमठा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. केंद्र सरकारच्या ‘सागरमाला’ योजनेंतर्गत शिरसी-कुमठा राज्य हमरस्त्याचा दर्जा उंचावून सदर रस्ता राष्ट्रीय हमरस्त्यात परिवर्तन करण्याचा निर्णय 2018 मध्ये घेण्यात आला. कुमठा तालुक्यातील दिवगीपासून शिरसीजवळच्या निलेकेणी येथील मासळी मार्केटपर्यंत सुमारे 50 ते 65 कि.मी. लांबीचा हा रस्ता उभारण्यासाठी 360 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. घनदाट जंगलातून देवीमने घाटातून जाणारा हा रस्ता तयार करण्याची जबाबदारी आर. एन. शेट्टी कंपनीकडे सोपविली आहे.
दहा-बारा दिवसापूर्वीच रस्ता कामाला सुरुवात
रस्ता कार्याला 2018 मध्येच हिरवा कंदील दाखवून निधीची तरतूद केली आहे. मात्र वेगवेगळय़ा कारणामुळे 2021 चा फेब्रुवारी महिना उजाडला तरी रस्ता कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नव्हती. शेवटी सर्व अडथळय़ांवर मात करीत फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात सुरुवात करण्यात आली. रस्त्यासाठी शिरसी वन विभागातील सुमारे पाच हजार झाडे तोडण्यासाठी निश्चित केली आहेत. यापैकी 15 ते 20 टक्के झाडे वनखात्याकडून तोडण्यात आली. रस्त्यावरील सीडी आणि पूल तयार करण्याच्या कामालाही सुरुवात झाली होती. रस्त्याकडेचे विद्युत खांब हलविण्यासाठी हेस्कॉमने प्रयत्न चालविले होते. शिरसी तालुक्यातील हनुमती येथे टोलनाका उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रेंगाळलेले रस्ता उभारणीचे कार्य मार्गी लागल्याने जनतेच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
अपेक्षापूर्तीचा आनंद अल्पकाळ
दरम्यान शिरसी येथील पर्यावरणप्रेमींनी रस्त्यामुळे होणाऱया वृक्षतोडीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्याने आणि न्यायालयाने पर्यावरणप्रेमींची बाजू उचलून धरल्याने वन खात्याच्या अधिकाऱयांनी झाडे तोडण्याचे काम थांबविले. परिणामी रस्ता उभारणीचे काम ठप्प आहे. त्यामुळे आता आणखी किती दिवस काम रेंगाळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ता उभारणीनिमित्त हजारो झाडांची कत्तल होऊन पर्यावरण धोक्यात येणार, असा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या व्यतिरिक्त रस्त्यामुळे वन्यजीवी प्रभावित होणार आहेत, असेही संगितले जाते.
पर्यावरणाच्या नावाखाली मूठभर पर्यावरणप्रेमी आणि काही संघटना विकासाच्या आड येत असल्याने सर्वसामान्य जनता क्रोधीत झाली आहे. अस्तित्वात असलेला शिरसी-कुमठा रस्ता खराब झाला आहे. रस्ता अरुंद आणि वळणाचा आहे. यामुळे जनता हैराण झाली आहे. पर्यावरणप्रेमींना जनतेचे हाल दिसत नाहीत का? हा मुद्दा उपस्थित होत आहे. हुबळी-अंकोला रेल्वे मार्गही पर्यावरणप्रेमींच्या आडमुठय़ा धोरणामुळेच अनेक वर्षे धूळखात पडला आहे. पर्यावरण आणि विकासाचा समतोल राखून वाटचाल केली पाहिजे, अशी येथील जनतेची भावना. त्याकरिता प्रत्येक ठिकाणी अडथळा आणण्याचे धोरण पर्यावरणप्रेमींनी थांबविले पाहिजे. अन्यथा त्रस्त जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.
वृक्षतोड करून सुपारीच्या बागा सजविल्या
शिरसी-कुमठा रस्त्याच्या रुंदीकरणाला विरोध करणाऱया काही पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोड करून सुपारीच्या बागा सजविल्या आहेत, असा आरोप केला जात आहे. तेव्हा त्यांना पर्यावरणाची आठवण येत नाही का? असा प्रश्न उपस्थित करून वन्यजीवी संवर्धन करणारे काही पर्यावरणप्रेमी वाघ, हरीण आदी प्राण्यांच्या कातडीचा वापर बसण्यासाठी करतात, असा दावाही केला आहे. वृक्षतोड करून आपल्या घरासाठी रस्ता तयार करणे आणि सर्वसामान्यांच्या भल्यासाठी रस्ते किंवा अन्य प्रकल्प राबविताना आडकाठी आणणे कितपत योग्य आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पर्यावरणप्रेमी ढोंगी : शिवराम हेब्बार
काही दिवसांपूर्वी येथे पत्रकारांशी बोलताना जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार, जिल्हय़ाच्या अभिवृद्धीला विरोध करणारे पर्यावरणप्रेमी ढोंगी असल्याचे म्हटले होते. या पर्यावरणप्रेमींना अनेकवेळा विनंती केली आहे. त्यांच्या भूमिकेमुळेच ज्या हुबळी-अंकोला रेल्वे मार्गावर 35 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता तो आता दीड हजार कोटीच्या घरात पोहोचला आहे. पर्यावरणाच्या नावाखाली विकासाला विरोध करणे म्हणजेच पर्यावरणाची काळजी काय? असा प्रश्न उपस्थित करून शिरसी-कुमठा रस्ता होणे गरजेचे आहे. सर्व खात्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावून प्रकल्प अनेक वर्षे रेंगाळत ठेवणे योग्य नव्हे, असे पुढे मंत्री हेब्बार यांनी म्हटले होते.