खासदार उदयनराजे भोसले -छत्रपती शिवाजी महाराज देशाची अस्मिता
प्रतिनिधी/ सातारा
तमाम देशाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या हृदयात वसलेले आहेत. त्यामुळे शिवजयंती ही साजरी झाली पाहिजे, मात्र साजरी करताना शिवप्रेमींनी प्रशासनाचे नियम पाळून आवश्यक ती काळजीही घेतली पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेवर अपार प्रेम केले, जनतेची काळजी घेतली होती, अशी भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.
साताऱयात आयोजित दौऱयाप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भावना व्यक्त केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. 19 फेब्रुवारी रोजी होणारी शिवजयंती साजरी प्रशासनाने मनाई केली असल्याबाबत खासदार उदयनराजेंना विचारले असता ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन खऱया अर्थाने जनतेची काळजी घेतली. तळहातावरील फोडासारखे जनतेला सांभाळले. जनतेला निर्भयपणे जगण्याचे भान त्यांनी दिली. सामाजिक समता, कायद्याचे राज्य म्हणजे काय असते हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्यानंतर कळते. त्यामुळे ते देशाची अस्मिता आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज जरी असते तरी त्यांनी अशा कोरोनासारख्या महामारीच्या काळात सर्वांना काळजीच घेण्याचे आवाहन केले असते. आपण सर्वांनी प्रथम लोकांची काळजी घेतली पाहिजे. पण त्याबरोबर त्यांची जयंती साजरी झाली पाहिजे, मात्र सर्वांनी कोरोना संसर्गात असलेले सर्व नियम पाळून स्वतःची काळजी घेत जयंती साजरी करावी, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
आरक्षणाबाबत भविष्यात ठोस निर्णय होतील
दरम्यान, यावेळी मराठा आरक्षणाबाबत आपण खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ते न्याय देतील असे वाटते का असे विचारले असता, हो त्यांना मी भेटलो. त्याबाबतचे सविस्तर वृत्तही आलेले आहे. मात्र, भविष्यात आरक्षणाबाबत ठोस निर्णय होतील अशी मला खात्री आहे. याबाबतची माझी भूमिकाही मी त्या त्या वेळी जाहीर करेनच.