श्रीमंत कोकाटे यांना आणखी अभ्यास करण्याचे धारकऱ्यांनी केले आवाहन
प्रतिनिधी / सातारा
राजवाडा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या शिवसमर्थ शिल्पाच्या पाठींब्यासाठी आता श्री. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान आता मैदानात उतरले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या धारकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचे आणखी पुरावेच सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सादर केले. स्वतः थोर एतिहास तज्ञ समजणाऱ्या श्रीमंत कोकाटे यांनी आणखी ग्रंथसंपदाचे, बखरींचे वाचन करावे, माहिती घ्यावी, मगच बोलावे, असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या धारकऱयांनी केले.
सातारा येथील राजवाडा बसस्थानकात उभारण्यात येणाऱ्या शिवसमर्थ शिल्पास नाहक विरोध करुन वातावरण गढूळ करण्याचे काम सध्या सुरु आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी या शिल्पावरुन महाराष्ट्रात उद्रेक होईल, असे भाष्य केले होते. त्यावरुन आज श्री. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्या धारकऱ्यांनी या शिवसमर्थ शिल्पाला पाठींबा देण्यासाठी मैदानात उतरला आहे. आज भवकम असे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा ही ऐतिहासिक नगरी आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या भूमीत शासनाच्यावतीने राजवाडा बसस्थानकात शिवसमर्थचे शिल्प साकारले आहे. त्याबाबत पुरावे आहेत. त्याकडे दुर्लक्ष करुन पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांनी विनाकारण या शिल्पावर आक्षेप घेतला आहे. काही समाजविघातक शक्तीकडून हे शिल्प हटवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काही वर्षापूवीं सज्जनगड येथील श्री रामदास स्वामी संस्थानच्यावतीने श्री शिवछत्रपती समर्थ योग हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यात झालेला पत्रव्यवहार प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज श्री.छ. उदयनराजे, श्री.छ.शिवेंद्रराजे, श्री.छ.शिवाजीराजे यांची प्रस्तावना या ग्रंथाला आहे. त्यामुळे सत्य नाकारुन चालणार नाही.श. आम्ही शहरातील शिवसमर्थ भक्त विनंती पत्राद्वारे शासनाचे अभिनंदन करतो आणि ऐतिहासिक अशा शिल्पाचे समर्थन करतो, असे म्हटले आहे. दरम्यान, धारकऱ्यांनी श्रीमंत कोकाटे यांनी आणखी अभ्यास केला आणखी वाचन केले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचे व त्यांच्या संबंधाची माहिती मिळेल, अशीही विनंती केली.