राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून नव नवीन विषयावर राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण, आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, माजी मंत्री संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप आणि या दोन मंत्र्यांना द्यावे लागलेले राजीनामे असोत एकीकडे शिवसेना आणि भाजपामधील दरी वाढत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी भक्कम होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालात जरी शिवसेना चौथ्या क्रमांकावर असली तरी राज्यातील सरकारचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणे यासाठी शिवसेना महाविकास आघाडीत बॅकफुटवर येताना दिसत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी शिवसेनापक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर जे आरोप केले ते पाहता शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येतील याची शक्यता मावळली आहे. आम्ही भाजपला सोडलं आहे, हिंदुत्व नाही भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, यातुनच सारे काही स्पष्ट होते. यापूर्वी ठाकरे यांनी कधी एवढी निर्वाणीची भाषा भाजपवर आरोप करताना वापरली नव्हती. 25 वर्षे आम्ही युतीत सडलो याचा पुनरूच्चार करताना भाजपला थेट हिम्मत असेल तर समोर येऊन लढा. एकटं लढण्याचं आव्हान द्यायचं आणि मागे ईडीची पिडा लावायची हे शौर्य नसल्याचा टोला त्यांनी भाजपला लगावला. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीचा निकाल बघितला तर नगरपंचायतीच्या 1791 घेषित निकालांपैकी 419 जागांवर भाजप, 381 जागांवर राष्ट्रवादी, 344 जागांवर काँग्रेस आणि 296 जागांवर शिवसेना विजयी झाली आहे. शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेल्याने विरोधकांनी विशेषतः भाजपने शिवसेनेच्या या यशाबाबत सडकून टिका केली. यापूर्वी शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांनीही प्रसंगी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढविल्या, मात्र त्याचा राज्याच्या राजकारणावर म्हणजेच युती आघाडय़ांवर कोणताच परीणाम झाल्याचे बघायला मिळाले नाही. त्या त्या सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र उध्दव ठाकरे यांनी भाजपवर केलेला घणाघात आणि संजय राऊत यांनी भाजपासोबत आम्ही 25 वर्षे युतीत होतो मात्र भाजपच्या आडमुठेपणामुळे ते संपलं असून युतीची कसलीही चर्चा नाही. दबके आवाजात काही नसल्याचे सांगत शिवसेना भाजपच्या एकत्र येण्याबाबत पूर्णविराम दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सेना भाजप संघर्ष वाढणार यात शंका नाही. एकीकडे शिवसेना भाजपातील दरी वाढत असताना मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी बळकट होत असल्याचे सध्या तरी †िदसत आहे.
नरगपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता नगराध्यक्षांच्या होणाऱया निवडणुकीतही महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष व्हायला हवा. यासाठी सर्व सदस्यांनी स्थानिक पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून करण्यात आले आहे. यासंदर्भातील पत्रच स्थानिक नेत्यांना तसेच नगर पंचायत सदस्यांना पाठविले आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त नगराध्यक्ष महाविकास आघाडीचे येतील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्राद्वारे करण्यात आले आहे. जर भाजपला सर्वाधिक जागा मिळुनही नगराध्यक्षाच्या निवडणुकीत समाधानकारक यश मिळाले नाही आणि महाविकास आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम या निवडणुकीत परफेक्ट राबवला गेला तर भाजपला हा मोठा धक्का असणार आहे.
राऊत विरूध्द सोमय्या सामना रंगणार
महाविकास आघाडी सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर भाजपने राज्य सरकारवर जोरदार टिका केली. त्यानंतर या वाईन उद्योगात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी वाईन उद्योजकांशी भागिदारी केली त्यांचे कुटुंबिय वाईन कंपनीत संचालक असल्याचा आरोप करताना, सरकारने हा निर्णय शेतकऱयांसाठी नव्हे तर वाईन उद्योजकांसाठी घेतला असल्याचे पत्रकार परीषदेत सांगितले. याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा काय ढोकळा विकतो का ? सोमय्यांचा मुलगा केळी विकतो का? वाईन कंपनीत संचालक असणे गुन्हा आहे का? असे बोलत थेट सोमय्या, भाजपची पिसे काढल्याने आता सोमय्या चांगलेच आक्रमक झाले असून वैयक्तिक पातळीवर आता आरोप होत असल्याने भविष्यात राऊत विरूध्द सोमय्या हा सामना रंगणार यात शंका नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच
नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा मात्र तेवढय़ाच पटीने वाढल्या आहेत. काँग्रेसच्या कमी झालेल्या जागा थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात गेल्या असल्याचे अनेक ठिकाणी चित्र आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या 27 नगरसेवकांसह महापौरांनी देखिल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 27 जानेवारी रोजी प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसच्या संपर्कात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी असून, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा इशारा नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. मात्र प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचे सूचक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालेगावच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेश करताना केला. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला हा धक्का काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे येणाऱया काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
प्रवीण काळे