बरे होण्याचे प्रमाण 96.98 टक्के
प्रतिनिधी /पणजी
राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे दोघांचे बळी गेले आहेत. तर 220 बाधित सापडले आहेत. त्याचबरोबर 188 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 1995 एवढी झाली असून बरे होण्याचे प्रमाण 96.98 टक्क्यांवर पोहोचले आहे.
गत 24 तासात 4517 जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील 220 बाधित सापडले. त्यापैकी 17 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 203 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले. 17 जणांना गोमेकॉतून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत वर्षभरातील एकूण बाधितसंख्या 168430 वर पोहोचली आाहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 163347 वर पोहोचली आहे. एकूण मृतसंख्या 3088 एवढी झाली आहे. शुक्रवारी बळी गेलेले देन्ही रुग्ण गोमेकॉत उपचार घेत होते. त्यात एका 35 वर्षीय युवकाचा समावेश असून दुसऱयाचे वय 84 वर्षे होते.
कुठ्ठाळीत सर्वाधिक 135 रुग्ण
शुक्रवारी राज्यातील 33 पैकी कुठ्ठाळी, मडगाव आणि फोंडा या केंद्रांतील रुग्णसंख्या तीन अंकी होती. त्यातील कुठ्ठाळी केंद्रात सर्वाधिक 135 रुग्ण होते. फोंडा केंद्रात 131 तर मडगाव केंद्रात 118 रुग्ण होते. सर्वात कमी 9 रुग्ण कासारवर्णे केंद्रात आहेत.
अजूनही वाढणार संचारबंदी
येत्या सोमवारी 12 जुलैनंतर संचारबंदीत वाढ करण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले असून ती आता वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या चालू असलेली संचारबंदी 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत असून कोरोनाचे संकट अजुनही कायम असल्यामुळे संचारबंदीत वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे दिसून आले आहे.
गेल्या 9 मे पासून संचारबंदी चालू असून त्याला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. सध्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास अनुमती असून त्यानंतर रात्री संचारबंदी लागू होते. त्यामुळे संचारबंदी 6 वाजल्या नंतर रात्री शुकशुकाट असतो.
कोरोनाचे संकट संपलेले नाही. प्रतिदिन 2 ते 4 बळी जात असून दररोज 150 ते 200 च्या आसपास बाधित सापडत आहेत. त्यामुळे संचारबंदी वाढविण्याची गरज आहे. ती वाढवताना काही गोष्टी शिथिल करण्यावर विचार केला जाणार आहे. त्यामुळे संचारबंदी व त्यातील निर्बंध आणखी काही काळ चालू राहणे आवश्यक आहे, असे मत डॉ. सावंत यांनी व्यक्त केले. कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी राज्य सरकार सज्ज असून त्याकरीता तज्ञ सुविधा समिती कार्यरत आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.