खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
प्रतिनिधी / कराड
कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग 166 वरील संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर झाला आहे. तशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिली असून हा निधी उपलब्ध करण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे या मार्गाचा दर्जा सुधारणार असल्याने दळणवळणाची चांगली सोय होणार आहे.
कराड-चिपळूण-गुहागर महामार्गावरील पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का ते घाटमाथा या 13.10 किमी. अंतराच्या कामासाठी 16.85 कोटीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी मंजूर केला आहे. तशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी केली होती. कोकणच्या दिशेला जाणा-या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र पाटण तालुक्यात पावसाळ्यामध्ये जादा पाऊस पडत असतो. त्यामुळे या मार्गावर खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा होत असते. कोयना विभागासह इतर डोंगरी भागातील लोकांना या मार्गावरून पावसाळ्यात प्रवास करणे अडचणीचे व जिकीरीचे ठरते.
तर या मार्गाची दुरावस्था झाल्याने कोकणाकडे जाणा-या नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी राजकिय व सामाजिक संघटनांनी आंदोलने केली होती. तसेच संगमनगर धक्का, गोषटवाडी, राम मळा, दास्तान, रासाटी, कोयनानगर, हेळवाक, शिवंदेश्वर, नेचल, बोपोली व घाटमाथा या गावांतील ग्रामस्थांनी खा. श्रीनिवास पाटील यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या व्यथा मांडत हा रस्ता दुरुस्त होण्याबाबत विनंती केली होती.
याशिवाय माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी देखील खा. श्रीनिवास पाटील यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. त्यानुसार खा. पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कोल्हापूर विभाग कार्यकारी अभियंता संजय सांगावकर यांना 22 मे 2020 रोजी पत्र लिहून तशी सूचना केली होती. त्याचबरोबर दिल्ली येथे लोकसभेच्या अधिवेशन काळात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून तशी मागणी केली होती. तसेच त्यासंदर्भातील पाठपुरावा वेळोवेळी केला होता. खा.पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार हा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मंजूर करून दिल्याबद्दल ना.गडकरी यांचे खा.पाटील यांनी आभार मानले आहेत. तर यामुळे दळणवळणच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या या मार्गाचा दर्जा सुधारणार असून विकासाला गती मिळेल , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.