उदय सावंत/ वाळपई
सत्तरीत गणेशचतुर्थी काळात भजन कलेद्वारे महिलांनी पारंपरिक घुमट आरती सादरीकरणात आपली छाप पाडल्याचे चित्र पहावयास मिळाले.
सत्तरीत अनेक गावांमध्ये महिलांची प्रशिक्षित घुमट आरती पथके तयार झाली आहेत. त्यांनी चतुर्थी काळात विविध ठिकाणी चांगल्या प्रकारे घुमट आरतीचे सादरीकरण केले आहे. महिलांचा वाढता प्रभाव पाहता सत्तरीत आगामी काळात पारंपरिक भजनाला चांगले दिवस येतल असे दिसत आहे.
सत्तरीत गेल्या दोन वर्षापासून घुमट आरतीद्वारे प्रामुख्याने महिला पुढे येताना दिसत आहेत. यामध्ये विवाहित व अविवाहित महिलांचाही समावेश आहे. काही भजनी प्रशिक्षक सहकार्य करत आहे. मोर्ले येथील रामकृष्ण गावस यांनी अशी अनेक पथके तयार केली आहेत. त्यांना चतुर्थी काळात सार्वजनिक गणपती व इतर ठिकाणी घुमट आरती सादरीकरण केले आहे.
भजनांना येणार चांगले दिवस
सत्तरीतील प्रत्येक गावातील मंदिरात आजही विविध भजने सादर होतात. यामध्ये खास करून जे÷ कलाकारांचा समावेश असतो. तरुण पिढी भजनाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे भविष्यात भजन कला बंद पडणार की काय असा प्रश्न निर्माण झला होता. मात्र भजन कलेत महिलांनी लक्ष घातल्यामुळे आता भजनांना उज्वल भवितव्य असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात सध्या 20 पेक्षा जास्त महिला भजन पथके तयार झाली आहेत. अनेक पथके गावांमध्ये भजन सादर करताना दिसत आहेत.
सत्तरीत सध्या कोपार्डे येथील घुमट आरती मंडळ, मोर्ले कॉलनी येथील बारांवश घुमट आरती मंडळ, केरी येथील सातेरी आजोबा घुमट आरती मंडळ, मोर्ले कॉलनी येथील सातेरी केळबाई घुमट आरती मंडळ, अंजुणे व खोतोडे येथील जय गणेश आरती मंडळ यांचा खास करून समावेश आहे. या पाच पथकांनी अनेक ठिकाणी राज्यस्तरावर घुमट आरती सादर केल्या आहेत.
भजन कला टिकविण्यासाठी प्रयत्न : रामकृष्ण गावस
सत्तरीतील भजन कला बंद पडू नये म्हणून दहा महिला भजनी पथके तयार केली आहेत. प्रत्येक गावात भजनी पथक तयार व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आहेत. भजन तसेच घुमट आरतीत महिलांचा कल अधिक आहे हे पाहिल्यास युवकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पारंपरिक भजन संस्कृती टिकवायची असेल तरुणांनी या कलेची पालखी आपल्या खांद्यावर घ्यावी, अन्यथा ही संस्कृती नष्ट होण्यास वेळ लागणार नाही, असे भजनी कलाकार रामकृष्ण गावस म्हणाले.