बेळगाव / प्रतिनिधी
शहरात बेकायदा वृक्षतोड सुरूच आहे. गुरुवारी सदाशिवनगर येथील मुख्य रस्त्याशेजारी असलेल्या वृक्षांच्या फांद्या कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.
येथील मुख्य रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने कर्मचारी परस्पर वृक्षांची तोड व फांद्यांची छाटणी करत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी आणि बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी प्रशासनामार्फत अनेक उपाय केले जात आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करून शहर परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड सुरू आहे. वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठीही परवानगीची गरज आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून परस्पर फांद्यांची छाटणी करताना दिसून येत आहे. मनपाचे दुर्लक्ष झाल्याने शहर परिसरात झाडांची कत्तल सुरू आहे. ती तातडीने थांबवावी, अशी मागणी पर्यावरणपेमींतून होत आहे.