बालभारतीची एकात्मिक पाठय़पुस्तक योजना : पायलट प्रोजेक्टसाठी जिल्हय़ात कुडाळ तालुक्याची निवड
पुस्तक असेल तीन ते चार भागात : यावर्षीपासूनच येणार नवीन पुस्तके : 240 शाळांमध्ये लवकरच पुस्तके
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
शालेयस्तरावर शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना फारसे यशही मिळालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. शालेयस्तरावर सर्व विषयांची पुस्तके, वहय़ा, डबा, पाण्याची बॉटल, कंपासपेटी असे साहित्य असल्याने विद्यार्थ्यांपेक्षा दप्तराचे ओझेच अधिक होते. यावर पर्याय म्हणून आता बालभारतीतर्फे ‘एकात्मिक पाठय़पुस्तक’ योजना आणली आहे. यात सर्व विषयांचे मिळून एक पुस्तक तीन व चार भागांत असणार आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार असे पाठय़पुस्तक शाळेत नेणे सहज सोपे होणार आहे. शासनाकडून मराठी माध्यमासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून जिल्हय़ातील कुडाळ तालुक्याची निवड केली आहे. तालुक्यातील सुमारे 240 मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अशी पुस्तके लवकरच उपलब्ध होतील, असे शिक्षण विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी हा शारीरिक व बौद्धिकदृष्टय़ा सक्षम असला पाहिजे. शालेयस्तरावरील शिक्षण घेताना विद्यार्थ्याला विविध विषयांचे अध्ययन करावे लागते. दैनंदिन शालेय जीवनात वेळापत्रकानुसार विद्यार्थी प्रत्येक दिवशी विविध विषयांचा अभ्यास करतात. यासाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांना आवश्यक ते सर्व अध्ययन साहित्य सोबत ठेवावे लागते. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे सतत वाढत आहे ही बाब प्रकर्षाने जाणवू लागली. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल, याबाबत शासन निर्णयाद्वारे काही उपाययोजना सूचविल्या आहेत. या उपाययोजनांची जबाबदारी सर्वच घटकांवर सोपविण्यात आलेली आहे.
ओझ्यामुळे शारीरिक, मानसिक आजार
प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणाऱया विद्यार्थ्यांमध्ये, पाठदुखी, स्नायू आखडणे, मणके झिजणे, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, डोकेदुखी, मानसिक ताण आदी आजार-विकार निर्माण होत आहेत. बालवयात जडणाऱया या आजारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्मयात येऊ शकते. या भावी नागरिकांचे मानसिक, शारीरिक व बौद्धिक आरोग्य उत्तम ठेवणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ओझ्याविना शिक्षण या संकल्पनेच्या माध्यमातून शासनाने काही ठोस पावले उचलली आहेत. शासन निर्णयाच्या आधारे पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन या सर्वांनी करायच्या उपाययोजना निश्चित केल्या आहेत.
एकात्मिक पाठय़पुस्तक योजना
या अंतर्गतच्या संकल्पनेतूनच शासनामार्फत शालेयस्तरावरील अध्ययन अध्यापन प्रक्रियेसाठी एकात्मिक पाठय़पुस्तक योजना आणण्यात आली आहे. एकात्मिक पाठय़पुस्तक म्हणजे विद्यार्थ्याने आवश्यकतेनुसार अध्ययन साहित्य सोबत ठेवणे. सद्यस्थितीत प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र पाठय़पुस्तक दिलेले आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकाप्रमाणे सर्व पाठय़पुस्तके सोबत घ्यावी लागतात. ही सर्व पाठय़पुस्तके एकत्र सोबत घेतल्यामुळे दप्तराच्या ओझ्यात वाढ होत आहे. यामुळे वर्गात जो विषय शिकविला जातो, तेवढेच अध्ययन साहित्य सोबत नेता येईल, यावर विचार करण्यात आला. यातूनच एकात्मिक पाठय़पुस्तक प्रकल्प आणण्यात आला आहे. वेळापत्रकाप्रमाणे सर्व विषयांचे एकच पाठय़पुस्तक सहज सोबत शाळेत घेऊन जाणे विद्यार्थ्यांना शक्मय होणार आहे. पहिली ते पाचवी या स्तरावरील विषयांची संख्या कमी असल्याने तीन भाग करण्यात येणार असून सहावी व सातवीसाठी विषयांची संख्या जास्त असल्याने आवश्यकतेनुसार चार भाग केले जाणार आहेत.
राज्यातील 59 तालुक्यांची निवड
यासाठी शासनाने सुमारे 59 तालुक्यांची निवड केली असून सिंधुदुर्गमधून कुडाळ तालुक्याची निवड केली आहे. कुडाळ तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शाळांसाठी अशी पुस्तके लवकरच प्राप्त होणार आहेत. जिल्हय़ासाठी आवश्यक असलेल्या एकूण पुस्तक संख्येच्या 89 टक्के पुस्तके प्राप्त झाली आहेत. यात कुडाळ तालुक्यासाठी मराठी माध्यम वगळता इतर माध्यमांसाठी लागणारी पुस्तके प्राप्त झाली आहेत. जिल्हय़ाच्या पुस्तक संख्येच्या 11 टक्के पुस्तके जी येणे बाकी आहे, ती कुडाळ तालुक्यातील असून एकूण पुस्तक मागणीच्या 68 टक्के आहेत. उर्वरित 32 टक्के पुस्तके इतर माध्यमांची असून ती प्राप्त झाली आहेत. ही 68 टक्के पुस्तके एकात्मिक पाठय़पुस्तक योजनेतील असून ती लवकरच प्राप्त होतील, असे शिक्षण विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर राज्यातील सर्व शाळांमध्ये ही पद्धत राबविण्याचा निर्णय होणार आहे.