दोन वर्षांपासून रखडले होते काम
प्रतिनिधी / नागठाणे :
सातारा तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यामध्ये बोरगावहून अपशिंगे (मि.) मार्गे देशमुखनगरला जाणाऱ्या सुमारे आठ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचीही अवस्था दयनीय झाली आहे. खचलेल्या साईडपट्ट्या, मुजलेले नाले व संपूर्णपणे उखडलेला रस्ता अशी परिस्थिती असून वाहनचालकांना वाहन चालवताना जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागत होते. त्यातच या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला अनेकांनी विनाकारण खो घातला आणि काम थांबले गेले. येथील जनतेची होत असलेली ससेहोलपट पागुण अखेर साताराच्या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यामध्ये लक्ष घातले. या रस्त्याच्या कामासाठी मध्यस्ती करून सुमारे अडीच कोटी रुपये मंजूर केले व या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.
याबाबत अधिक माहिती देताना आंबेवाडीचे बाळासाहेब शितोळे व अपशिंगे (मि.) चे सुभाष निकम यांनी सांगितले की, आठ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. त्याचे कामही सुरू झाले होते. मात्र, काही शेतकरी व काही संघटनांनी य रस्त्याच्या कामाला खो घातला. यामुळे काम रखडले गेले.व येथील जनतेला त्रासाला सामोरे जावे लागले.
याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,वर्णे गटाचे जि. प.सदस्य मनोजदादा घोरपडे व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे रस्त्याच्या कामासंदर्भात पाठपुरावा केला.त्यांनीही या रस्त्याच्या कामातून सर्वांची सोय होणार आहे. या रस्त्यामुळे कोणीही बाधित होणार नाही. शिवाय मंजूर झालेला निधी वेळेत खर्च झाला नाही तर तो परत जाऊ शकतो ही बाब सगळ्यांच्या लक्षात आणून दिल्यामुळे अखेर या रस्त्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरवात झाली.
आठ किलोमीटर लांब, काही ठिकाणी साडेचार मीटर तर काही ठिकाणी ३.७५ मिटर रुंद व सुमारे अडीच कोटी रुपये अंदाजपत्रक असलेल्या या रस्त्याच्या साईडपट्ट्या भरणे,खडीकरण व डांबरीकरण येत्या काही महिन्यात पूर्ण केले जाणार आहे.