देशमुखनगर / वार्ताहर :
सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धुमशान-गावा-गावात सुरु आहे. मात्र, याला अपवाद लिंबाचीवाडी ता.सातारा येथील ग्रामपंचायत ठरली. गाव म्हटलेकी गट-तट राहतात, पण यावेळी दोन्ही गट एकत्र आले आणि त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये पाच जागा आहेत या दोन गटामध्ये ३/२ असा फॉर्म्युला ठरला असून, यामध्ये पाच सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीत बिनविरोधसाठी रामदास श्रीरंग कणसे, मनिषा प्रदिप पिसाळ, संगीता राजेंद्र कणसे, बाळकृष्ण गोविंद कणसे, जयश्री संजय गायकवाड यांची निवड करण्यात आली. पहिले सरपंच पद आडीच वर्षे घेणाऱ्या गटास २ जागा आणि नंतर घेणाऱ्या गटास तीन जागा असे ठरले. हा ठराव गावचे श्रध्दास्थान कारजाई मंदिर येथे सर्वानुमते झाला. या ठरवामध्ये रामदास कणसे यांच्या गटास पहिला सरपंच पदाचा मान देण्याचे ठरले. व प्रशांत कणसे यांच्या गटास तीन जागा देत आडीच वर्षानंतर मान मिळणार आहे.
लिंबाचीवाडी ही कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील राजकीयदृष्ट्या महत्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. यापूर्वी या गावच्या झालेल्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होत्या. येथील दोन पारंपारिक पैनेलमध्येच या निवडणुका होत होत्या.त्यामुळे या गावच्या निवडणुकीकडे भागातील जनतेचे नेहमीच लक्ष वेधले जात होते.