कर्मचाऱ्यांची चूक नसताना होतोय फाईन
आगारात अस्वच्छता उठलीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर
शौचालयाच्या स्वच्छतेचे तीन तेरा, निर्जंतुक फवारणी नाही
प्रतिनिधी / सातारा
वाई आगार अनलॉक झाल्यापासून धावू लागला आहे. तेव्हापासून वाई आगाराच्या स्वच्छतेची ऐसीतैसी झाली आहे. विना वाहक बुकिंग सेंटरची अक्षरशः जाळ्या झाल्या आहेत. बसस्थानक परिसराच्या बाजूने गवत वाढल्याने मच्छर वाढले आहेत. निर्जंतुक फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे अगोदरच कोरोनाची भीती त्यात आगारात अस्वच्छता असल्याने कर्मचाऱ्यांना आरोग्याची भीती वाटू लागली आहे.
वाई आगाराचे प्रशासन पुरते कोलमडून पडले आहे. ज्यांच्या जीवावर आगार चालतो त्या कर्मचाऱ्यांना कसलीही सुरक्षितता नाही. अनलॉक सुरू होताच पुन्हा प्रवाशांना सेवा देण्यासाठी वाई आगारातील कर्मचारी भीती झुगारून कामाला लागले आहेत. मिळेल ती ड्युटी करत आहेत. मात्र, आगारालाच अवकळा आली आहे. अगदी विना वाहकचे बुकिंग सेंटर आहे त्या सेंटरमध्ये अक्षरशः जाळ्या बनल्या आहेत. वाई सातारा विना वाहक विना थांबा ही सेवा सुरू करताना स्वच्छता करण्यात आली नव्हती त्यामुळे ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच अस्वच्छता असलेल्या ठिकाणी काम करावे लागत आहे.तसेच आगारात असलेले शौचालय व्यवस्थित स्वच्छ केले जात नाही. स्टँडच्या बाजूने गवत वाढले असून मच्छर आहेत. निर्जंतुक फवारणी करण्यात आली नाही, यावरून कर्मचाऱ्यांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.