वाठार किरोली / प्रतिनिधी :
वाठार किरोली येथील महादेवाच्या ओढ्यावरील पुलावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने तारगाव, नांदगाव, निसराळे मार्गे सातारा जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे वाहनधारकांना किरोली मार्गे वाहतूक करावी लागली.
पुलाची उंची कमी असल्याने आणि लगेच मोठा चढ असल्याने ट्रॅक्टर चालक डबल वाहन जोडून जाण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळेच वाहने पलटी होण्याचा धोका निर्माण होतो. यामध्ये शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. पलटी झालेल्या ट्रॅक्टर उसाच्या कांड्यानी भरलेला होता. त्या कांड्या भरावयाच्या असतील तर मोठी कसरत करावी लागते. अगोदरच शेतकरी मेटाकुटीला आला असताना शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे, याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.