अध्याय अकरावा
साधुपुरुषाची लक्षणे उद्धव लक्षपूर्वक ऐकत होता. भगवंत त्याला एक एक लक्षणे उलगडून, आवश्यक तेथे उदाहरणे देऊन समजाऊन सांगत होते. ते म्हणाले,
ब्रह्मस्वरूप असलेला आपला स्वामी त्याला सर्व प्राणिमात्रांमध्ये दिसत असतो. म्हणून मानाभिमान सोडून अतिशय नम्रवृत्तीने त्याचे वागणे चालू असते.
ह्याचेच नांव ‘अमानिता’ (म्हणजे निरभिमानपणा). हे साधूचे तेविसावे लक्षण. आता साधु हा सन्मान देणारा कसा असतो तेही ऐक. ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरी बुद्धीच तो जाणत नाही. म्हणून तो ब्रह्मदेवापासून माशीपर्यंत सर्वांना शिरसावंद्य मानतो. देव, मनुष्य किंवा गाढव हा भेदाभेद मनात आणतच नाही. सर्वांनाच तो मोठय़ा संतोषाने वंदन करतो. नावाच्या किंवा रूपाच्या निरनिराळय़ा प्रकाराने आपल्या मनात बदल करावा हे तो जाणतच नाही. समुद्रामध्ये जरी नानाप्रकारचे अक्राळविक्राळ अनंत कल्लोळ उसळले तरी त्यांच्यामध्ये शुद्ध पाणीच असते. त्याप्रमाणेच कोणताही प्राणी घेतला तरी त्यात ब्रह्मस्वरूपच भरलेले आहे अशा समजुतीने साधु हा सर्व प्राणिमात्रांना सन्मानच देत असतो. हेच त्याचे चोविसावे लक्षण होय. आता त्याची ‘परबोधकता’ म्हणजे दुसऱयाला बोध करण्याचे सामर्थ्य कसे असते ते ऐक. ज्याचा जसा भाव आणि जशी श्रद्धा असते, त्याला तसाच उपदेश करण्याचे साधूला माहीत असते. ज्ञानप्राप्ती होऊनही ज्याची बुद्धि इकडे तिकडे वळणार नाही, त्याला तो स्वरूपावरील श्रद्धेचा उपदेश करतो. त्याआधी तो शिष्य उपदेश करण्याला पात्र आहे की नाही ते तपासून पाहतो वेडे, मदाड, कृपण, सत्पात्री दान न करणारे, दुसऱयाला समजून न घेणारे, धनलोभी, दुसऱयाच्या अंगावर खेकसणारे, अशांना साधुपुरुष बोध करत नाही हे लक्षात घे. तो शब्दज्ञानात पारंगत असून ब्रह्मानंदात निरंतर डुलत असतो आणि शिष्याला उपदेश करण्याला समर्थ असतो. असा साधुपुरुष माझे मूर्तिमंत स्वरूप असतो.
मी जसा अवतार धारण केला आहे, तसाच तोही अवतारी असतो. म्हणूनच तो चित्स्वरूपाच्या अलंकाराने सच्छिष्याला अलंकृत करतो. ‘तो’ आणि ‘मी’ असे निरनिराळे शब्द मी उच्चारत असलो तरी त्यांत केवळ बाह्यदृष्टीने फरक दिसतो पण त्या दोन्ही शब्दांचा अंतर्गत विचार केला असता आम्ही दोघेही एकाच घरात नांदत असतो. ज्याप्रमाणे शेतकरी पेरणी करतो, तेव्हा भूमि उत्तम असल्यास पीक अगदी गजबजून येते व निखालस माळ जमीन असली तर तेथे एक मोडसुद्धा फुटत नाही. प्रत्यक्षात बी उत्तमच असते त्याप्रमाणे तो सर्वांना एकसारखाच उपदेश करत असतो. ज्याची जशी समज असेल तसा त्याला तो समजतो. ह्या उदाहरणांत भूमीच सरसनिरस असते, बीज खरोखर पवित्रच असते. त्याप्रमाणे भाविक लोकांच्याच ठिकाणी उपदेशाचा विस्तार चांगला होतो. तर्कटी लोक हे शुद्ध माळरान म्हणायला हरकत नाही जो शिष्य ज्या प्रकारे अर्थ समजू शकेल, त्याच रीतीने उपदेश करून त्याला परमार्थाकडे लावावयाचे, असा दुसऱयाला उपदेश करण्याचा जो प्रभावी गुण असतो, तोच ‘परबोधकता’ नांवाचा साधुचा पंचविसावा प्रख्यात गुण होय. साधूची मैत्री ही तशीच उत्तम असते. सर्वांशी त्याची ओळख जुनीच. तो सर्वांचाच थोर मित्र असल्यामुळे सर्वांना सरसकट सारखाच असतो. तोच सर्वांचा जिवलग व सोयरा. तो सर्वांहून निराळा राहून मित्रत्व चालवितो. अगदी गुप्त गोष्ट असली तरी ती हळूच कानात सांगावयाला तो काही परकेपणा मानत नाही. सर्व जगाकडे तो आप्तभावनेने पाहतो. सर्वाविषयी त्याचे अंतःकरण निष्कपट असते. दुध आणि पाणी जसे एकजीव होते त्याप्रमाणे साधूही सर्वांशी ऐक्मयभावाने व मित्रत्वाने वागून सर्व जीव आपल्या ठिकाणी समरस करून घेतो. खऱया मित्राचे लक्षण म्हणजे तो मित्राचे दुःख हरण करून त्याला सुख देतो. त्याप्रमाणे साधूही जीवांचे दुःख निवारण करून त्यांना अत्यंत सुख देत असतो. साधूच्या मैत्रीचा महिमा फार अगाध आहे. तो सर्वांचा जुनाच मित्र आहे. पण सगळय़ांशी त्याचे सौजन्य नित्य नवेच असते. तो सदासर्वदा निष्कपट असतो. जगमित्रता हे साधूचे सव्हीसावे लक्षण होय.